पाण्याच्या टाक्यांचा किल्ला सांकशी

पाण्याच्या टाक्यांचा किल्ला सांकशी


सांकशी किल्ल्यावरून दिसणारी दरी 
रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचे आगार. याच किल्ल्यांच्या आगारात थोडासा अडगळीत आणि दुर्लक्षित असलेला किल्ला म्हणजे पेण चा सांकशी किल्ला. पेण म्हणजे गणेश मूर्तिकारांचे माहेरघर. पण याच तालुक्यात सांकशी सारखा एक वैशिट्यपूर्ण किल्ला आहे हे अगदी स्थानिक लोकांना सुद्धा फार कमी माहित असेल. कधीकाळी इतिहासात वैभवाच्या शिखरावर असणारा हा किल्ला आज मात्र दुर्लक्षित आहे. पूर्वी पेण चा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रांतून आढळतो. ब्रिटिश काळापर्यंत उपविभागातील गावांचे मुख्यालय सांकशी इथे होते आणि त्यानंतर ते पेण ला स्थलांतरित झाले. काळाच्या ओघात पेणचा विकास झाला आणि सांकशी मात्र मागे राहिले ते कायमचे. पेण शहराच्या ईशान्येस पनवेल पासून साधारण १८ कि.मी. अंतरावर मुंबई -गोवा महामार्गापासून बळवली गावातून निढवली गावाच्या हद्दीत हा किल्ला आहे. सोपा मार्ग म्हणजे महामार्गावरून तरणखोप ला उतरायचं आणि गावाच्या पाठीमागून सरळ रस्ता आपल्याला घेऊन जातो तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी बद्रुद्दीन दर्ग्याजवळ. असे म्हणतात कि याच्या पायथ्याशी पूर्वी काळ्या पाषाणाचे एक मंदिर होते परंतु परकीय आक्रमणात ते लोप पावले आणि आता मात्र त्याचे काही अवशेष हे पायथ्याशी असलेल्या मशिदीच्या जोत्याला वापरलेले दिसून येतात. सांकशी खालावला पण दर्गा मात्र दिमाखात उभा आहे. परकीय आक्रमणाचे हे एक उत्तम उदाहरण.
विशेष म्हणजे पेण मध्ये बालपण जाऊनसुद्धा सांकशी पाहायचा योग्य कधी आला नव्हता. पण तो या वेळेला आला तो माझ्या परम मित्र नितेश मुळे. "मयुर; चल!! तुला सांकशी चा किल्ला दाखवतो" किल्ला छोटा आहे पण थोडासा एका टप्प्यावर कठीण आहे तुला थ्रिल येईल.". असे बोलल्यावर मी तर लगेच एका पायावर तयार झालो. मग  मी , गोपाळ आणि नितेश आम्ही तिघेच रविवारी सकाळी निघालो. बद्रुद्दीन दर्ग्याजवळ बाईक ठेवून आम्ही चढायला सुरुवात केली.
सांकशीचा इतिहास असा कि, सांक राजाने हा किल्ला बांधला आणि त्याच्या नावावरून याचे नाव सांकशी असे पडले. त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजे आजचे हमरापूर.  हमरापूर गावात काही प्राचीन अवशेष आढळल्याचे स्थानिक सांगतात. सांक आणि कर्नाळा किल्ल्याचा राजा यांच्यात युद्ध झाले त्यात सांक  राजा मारला गेला आणि म्हणून त्याच्या मुलीने वज्राईने गडावरून उडी मारून आत्महत्या केली तिची आठवण म्हणून गडावर एका टाक्याच्या बाजूला तिचे शिल्प कोरले आहे.. हीच वज्राई-जगमाता म्हणूनहि  ओळखली जाते१६ व्या शतकात सांकशी , कर्नाळा , आणि उत्तर कोकण यावर गुजरातचा सुलतानाचा अंमल होता. निजामाने नंतर हा  किल्ला जिंकून घेतला. परंतु तदनंतर पोर्तुगीजांच्या मदतीने गुजरातच्या सुलतानाने पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा निजाम आक्रमण करेल या भीतीने त्याने हे दोन्ही किल्ले वसईचा पोर्तुगीज कॅप्टन डी मेंझेस याला दिलेयाने पुन्हा आक्रमण करणाऱ्या निजामास निकराची झुंज देऊन पराभूत केले या लढाईत पोर्तुग्रीज सैनिक ट्रान्सकोझी याने केलेल्या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. परंतु निजमाकडून पुढे काही त्रास होऊ नये यासाठी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे म्हणून त्याला खंडणी देऊन कर्नाळा आणि सांकशी विकत घेतले. पुढे सांकशी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. नंतर इंग्रजांच्या काळात सांकशी हे प्रमुख चे  ठाणे झाले परंतु कारभाराची व्यवस्थित घडी बसल्यावर सांकशीचे ठाणे पेण ला हलवले आणि सांकशीला उतरती कळा लागली.
गडावरील पाण्याच्या टाक्यांमधून पाईपलाईन खाली दर्ग्याजवळ आणली  आहे तिला लागूनच वाट गडावर जाते. ओबडधोबड वाटेवरून चालायला  सुरुवात केल्यावर वरती  पहिले पाण्याचे टाके दिसले. पायऱ्यांच्या उजवीकडे कातळात खोदलेले एक दोन खांबी टाके दिसत होते. तिकडे जायला रस्ताचच नव्हता. तिथे जायचे तर कातळात  खोदलेल्या खोबण्यांना धरून सावकाश एकेक पावलाचा अंदाज घेऊन जावे लागणार होते. सुरुवातीला माझा  धीरच झाला नाही. नितेश मात्र पक्का ट्रेकर झाला होता. पटापट पार करून गेला मग त्याने धीर देत सांगितलं "अरे त्या खोबण्यांमध्ये हात टाक बरोबर आणि पावलाचा अंदाज घे.. त्यासाठीच बनवलया आहेत त्या ..मग येशील बरोबर " सुरुवातीला घाबरत सुरुवात केल्यावर मग धीर चेपला आणि मग सहज पार करून मी पाण्याच्या टाकी जवळ पोहोचलो. हा चढाईचा कस लागल्यावर आता मला  कळलं होतं कि, ""मयुर.. तुला थ्रिल येईल " असं नितेश मला का बोलला होता. 



पायऱ्या चालून आल्यावर आपल्याला ३ टाक्या लागतात आणि डाव्या बाजूला साधारण १० फूट खोलीचे जगमाता नावाचे चौथे टाके आहे. नंतर वर जाण्यासाठी एका छोट्याशा खिंडीपाशी येऊन पोहोचलो तेथून जाण्यासाठी पायऱ्या नष्ट  झाल्या होता. त्यामुळे सांभाळून वर जावे लागणार होते. हा कातळटप्पा चालून वर गेल्यावर  समोरच्या बाजूने एक तर दुसरी वळसा घालून वर जाणारी अश्या २ वाटा आम्हाला दिसल्या. उजवीकडे गाजिश नामक पाचवे टाके असून याच पातळीवर उत्तरेकडे आणखी २ मोठी खांब टाकी आहेत.  इथल्याच एका बाजूच्या टाक्यात शिरण्यासाठी साधारण ३ x ३ फूट आकाराचा दरवाजा दिसत होता. त्याच्या खांबांवर तर पण-फुलांची नक्षी कोरलेली आहे. लेण्यांवर असलेल्या कीर्तिमुखा सारखे त्या कोरल्या होत्या. 


प्रवेशद्वारावर शिल्प कोरलेलं  टाकं 

वर जाण्यासाठी असलेल्या प्रवेश द्वाराजवळच मारुतीची मूर्ती आणि शरभाचे शिल्पं ठेवलेल दिसून आलं. या छोट्याश्या किल्ल्यावर देखील शरभाचं शिल्प आढळून आलं हे विशेष.
वरती गडावरील आल्यावर राजवाड्याचे अवशेष , बालेकिल्ला आणि त्याला लागूनच पुन्हा काही पाण्याची टाकी आणि धान्यकोठार हे सर्व पाहून नंतर आम्ही पठारावर पोहोचलो. वरती पठारावर असलेल्या फार मोठ्या कातळावर त्याचा योग्य वापर करून म्हणा किंवा नैसर्गिकरित्या अनेक छोटे-छोटे रांजणखळगे तयार झाले आहेत. आणि त्याला लागून पाण्याच्या टाक्या हि खोदलेल्या आहेत. कदाचित त्यावेळेला टेहळणीसाठी जो कोणी इथे असेल त्याला पाणी पिण्यासाठी फार लांब जायला लागू नये  म्हणून असेल किंवा त्याचा वापर करून तात्पुरते एखादे छत देखील उभारता येत असेल असा विचार त्यावेळेला कदाचित केला असेल. तिथेच बाजूला एका कातळामध्ये कोरलेली बाणासारखी कसली तरी मार्गदर्शक आकृतीही आम्हाला पाहायला मिळाली. त्यावेळचा कसला तरी गूढ संकेत असावा बहुतेक!


पठारावरील रांजणखळगे (Potholes)
कातळामध्ये कोरलेला गूढ सांकेतिक संदेश
थोडा वेळ विश्रांती घेऊन तिथून आम्ही निघालो. त्याच्याच उजव्या बाजूला दिसणाऱ्या डोंगराचा बाहेर आलेला भाग दिसत होता. तिथे एक नैसर्गिक गुहा दिसत होती. तिथे जाण्यासाठी मात्र एखादा कसलेला गिर्यारोहक एखाद्या साधन सामुग्रीनेच जाऊ शकतो. पण तिथे फक्त एक दोर टाकून मी आणि गुरु आम्ही टाकी साफ करायला खाली उतरलो होतो असा अगदी लीलया हा माझा मित्र नितेश मला सांगत होता. त्याच्या हिमतीला एक सलाम ठोकून बालेकिल्ल्याच्या खाली असणाऱ्या टाक्याजवळ आम्ही आलो. इथल्या टाक्याची  रचना पाहून मी थक्क झालो. त्याच्या रचनेवरून त्याला पूर्वी एक दरवाजा असावा अशी व्यवस्था दिसत होती. शिवाय कातळामधून एक असा चर खोदलेला होता कि पावसाचे पाणी वाहत बरोबर त्या टाकीमध्ये उतरेल जणू काही एखाद्या पाईपने सोडावे असं. आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील पाणी हे चक्क पिवळं आहे. एक तर या टाक्यात उत्तरायला एकदम निमुळती दगडांचा आधार, जरा पाऊल चुकलं  तर खाली दरी स्वागतासाठी तयार .. परंतु दुर्गसंवर्धनचे काम हाती घेतल्याने गडावरील लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी नितेश खाली उतरला आणि आम्ही त्याला मदत म्हणून साखळी करून पाणी काढायला मदत केली.
पिवळं पाणी असणारे पाण्याचं टाकं 
सांकशीचे वैशिट्यच मुळात हेच कि ठिकठिकाणी कातळात पाण्याच्या भरपूर टाक्या खोदल्या आहेत. या किल्ल्यावर इतकी पाण्याची टाकी आहेत कि हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा. किल्ला जरी लहान असला तरी यावरून मिऱ्या डोंगर, कर्नाळा, माणिकगड नागफणीचा कडा व इतर ठिकाणे दिसतात. पश्चिमीकडे उगमापासून समुद्रापर्यंत नागमोडी वळणाने जाणारी नदीही फार छान दिसते. पावसाळ्यात तर येथील सौंदर्य नक्कीच खुलून येत असणार. सर्व न्याहाळून झाल्यावर गड उतरायला सुरुवात केली सूर्य माथ्यावर येई पर्यंत आम्ही गडाखाली पोहोचलो होतो. निघता निघता बाजूला असणाऱ्या दर्ग्याकडे पाहून मनात विचार आला कि, मूर्तिकला आणि शिल्पकले साठी  प्रसिद्ध असणाऱ्या पेण मध्ये असणारा हा सांकशी मात्र दुर्लक्षित राहिला त्याला गरज आहे ती संवर्धनाची आणि ती जबाबदारी उचलली आहे माझा मित्र नितेश याने. राजा शिवछत्रपती या परिवाराच्या माध्यमातून या गडावर साफसफाई केलेली आहे आणि मार्गदर्शक फलकहि लावले आहेत तदनंतर आत्तापर्यंत तिथलाच स्थानिक असल्याने आपल्या कामातून वेळ काढून जमेल तसा वेळ काढून तो गडावर संवर्धनाचे काम करतो. त्यामुळे आत्ता  किल्ला आणि पाण्याच्या टाक्या थोड्या सुस्थितीत आहेत.
गरज आहे ती असाच एक नितेश प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी निर्माण होण्याची म्हणजे महाराष्ट्राचे वैभव असलेले गड -किल्ले कधी आचके तोडणार नाहीत आणि दुर्लक्षितही  राहणार नाही.





आईच्या हातचा खाऊ

"आईच्या हातचा खाऊ"

नुकतीच दुरदर्शन वर एका सूपची जाहिरात बघितली. एक छोटी मुलगी आपल्या मम्मीला विचारते,
"आज मेन्यु मे क्या है?" एकदम छान आणि प्रेमळ हसणारी मम्मी Apron बांधुन मुलांना सुप देत
म्हणते, "छोटी छोटी भुक बाय !!बाय!!"
आणि मग पोटावरून हात फिरवत "अं सो यमीss" असं म्हणणाऱ्या त्या मुलीला
आपली मम्मी एकदम मास्टर शेफच"!!! वाटत असणार.

पण मनात विचार आला की आपली आई काही अशी अगदी नीटनेटकी आणि साडीला एकही साधी चुणी
नसणारी नव्हती. ती तर बिचारी सतत कष्ट करत असल्यामुळे दमलेली दिसायची.
आणि मग आठवला तो लहानपणीचा माझा खाद्यप्रवास......
मला आठवतं;लहानपणी भुक लागली की सांगायचो "आई! काहीतरी नवीन खायला बनवं ना! आणि तो
शिरा नको हो! काहितरी मस्त चटकदार बनवं.." आई बिचारी हो म्हणायची.
मग ते खमंग आणि ताज्या भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी आई लगेच वनगेच्या गिरणीवरून दळण
घेउन यायची का तर तिथे चांगलं मिळतं म्हणुन किंवा मला पाठवायची with special instructions
देऊन की, "त्यांना सांग भाजणीचं दळण आहे चांगलं काढुन दे."
छान भरपुर कोथिंबीर आणि कांदा घातलेल्या थालीपिठावर एक घरगुती साजुक तुपाची धार आणि सोबत
ओल्या नारळाची चटणी. अहाहा!! केवळ स्वर्गसुख.
मे महिन्याच्या आधी आईची लगबग असायची ती सगळे साठवणीचे पदार्थ बनवायची. १०/१० च्या
चाळीत राहुन सुद्धा त्यातुनच आई सगळं बरोबर मॅनेज करायची. खरी मॅनेजमेंट गुरू.
मग त्यात उडीद/तांदळाचे पापड, मिरगुंड, कुरड्या, फेण्या, भरलेली मिरची, मुरांबा, कोकमाचे सरबत असे
बरेच काही बनवायची. स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या काचेच्या बरणीमधील सुंदर लाल रंगाचे कोकम
साखर मीठ घालुन उन्हात ठेवले जायचं. मग हळुहळु त्यांचा रंग खुलत जाई. तापलेल्या तेलाच्या कढईत
२ इंचाचे मिरगुंड जेव्हा फुलून एका मोठ्या चपाती एवढा आकार घेत असे तेव्हा ते पाहताना मजा
यायची. अशी सगळी पारंपारिक पदार्थांची रेलचेल..तोंडाला चटकं लावणारी.

मग रोज रात्री पंगतीत जेवणाबरोबर यी पदार्थांची मेजवानी. कधी वालाची डाळ, कढी आणि ओली मिरची
तर कधी भाकरी आणि माठाची भाजी. पावसाळ्याचा मौसम असेल तर मिळणारी शेवळाची भाजी वगैरे
वगैरे. प्रत्येक भाजी खाल्लीच पाहिजे असा आईचा आग्रह असायचा का तर प्रत्येकातुन मिळणारी
जीवनसत्वं हि महत्वाची.
आत्ता सारखे नूडल, सुप्स असे कुठे खायला मिळायचे तेव्हा? पण रोज नव्या पदार्थाचा हट्ट. मग कधी
मायाळुच्या पानांची भजी (किती जणांना माहित असेल जरा शंकाच आहे); मुगाच्या पीठाचा पोळा;
कोथिंबिरीच्या किंवा कोबीच्या वड्या तर कधी कुरमुऱ्यांचा लाडू असे काही ना काही खायला मिळायचं.
आई खुप सारे मसाले चटण्या घरी करायची. खलबत्यात कुटून कुटून ते करायची. खलबत्त्याचा होणार
आवाज ऐकून मोठी गम्मत वाटायची. ती आईच्या हातची लसणीची तिखट आणि भरपूर तेल घातलेली
चटणी आणि गोल शुभ्र भाकरी आठवली की अगदी आत्ताही जागच्या जागी भूक लागते आणि तोंडाला
पाणी सुटते.
आता आईचे वय झाले. आधीसारखे खुप कष्ट तिला जमत नाहीत. पण तरी ही त्यातूनच आमच्यासाठी
कसकसली पीठ, भूक लाडू- तहान लाडू, वडे बनवणे चालूच असते तिचे. का तर! नोकरी निमित्त बाहेर
गेलेली पोरं आठवडा-महिनाकाठी घरी येणारं म्हणुन.
त्यादिवशी तिने साध्या केलेल्या खिचडी भातावर एक साजुक तुपाची धार टाकुन किती जेवलो याचा
अंदाजच आला नाही.
अचानक आठवले, आपली खाद्ययात्रा एवढी समुद्ध करणा-या आईला आपण कधीच म्हणालो नाही की
"मम्मी तुम तो वर्ल्ड की बेस्ट मम्मी हो। i love you मम्मी।". असं आत्ताच्या मुलांसारखं express
करायला कधी जमलचं नाही. तेच काम आताच्या आई 5 रुपयाच्या मॅगी देऊन करतात बहुतेक.
खरचं आपण ८०-९० दशकाच्या मुलांनी जे पाहिलं अनुभवलं ती आत्ताची शहरातील मुले उपभोगतील का
यात थोडी शंकाच आहे. आपण पाहिलेली हि आपली समृद्ध खाद्य परंपरा जर जोपासली नाही तर
पुढच्या पिढीला त्याला मुकणार आहे हे नक्की.

Note:-  This article has been published in 29th june 2018 lokprabha. link as below.

http://epaper.lokprabha.com/m5/1705832/Lokprabha/29-06-2018#issue/56/1

गोवा-टण (सप्तकोटेश्वर मंदिर ते सान्तइंस्तेव्हामचा किल्ला)



गोवा-टण  (सप्तकोटेश्वर मंदिर ते सान्तइंस्तेव्हामचा किल्ला)






गोवा म्हणजे निसर्गाने मानवाला बहाल केलेला सुंदर दागिनाच. वर्षभर पर्यटकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या गोव्याने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. तेथील निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. गोवा म्हणजे फक्त नयनरम्य समुद्रकिनारे एवढेच नसून येथील ठिकाणांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे.
अशा ठिकाणांपैकी एक आहे सान्तइंस्तेव्हामचा किल्ला जिथे संभाजीराजांनी मांडवी नदीमध्ये घोडे घातले होते आणि पोर्तुगीजांना सळो कि पळो करून सोडले होते आणि दुसरे म्हणजे गोव्यातील नार्वे गावामधील सप्तकोटेश्वर मंदिर. रमणीय आणि शांत परिसर, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शंकराचे  जुने मंदिर. एवढीच याची विशेषतः नाहीतर आपल्या शिवाजीराजांनी बांधलेले हे मंदिर हि त्याची खरी ओळख आहे.
खास यासाठीच गोव्याचा प्लॅन बनवला. फक्त ३ दिवसात गोवा!! काय जाऊन मजा करणार तुम्ही? एक दिवस तर जायला-यायलाच जाणार. ज्यांना माहित झालं होतं त्यांनी खोचक शब्दात मला सुनावलं. गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे, विदेशीपर्यटक, मद्य आणि मजा हे एवढचं समीकरण असतं बहुतेकांच असा सर्वसाधारण समज. पण मुळात माझा जाण्याचा हेतू इतिहासाची आवड म्हणून या दोन स्थळांना  भेट देण्याचा होता.
नवीनच रेल्वे मध्ये दाखल झालेलया तेजस एक्सप्रेसच बुकिंग करून आम्ही सकाळी निघालो. तेजस एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे एकदम आरामदायी, वातानुकूलित; थोडक्यात फॉरेनमधल्या ट्रेनचा फील.  रेल्वे मधेच आम्हाला rodrigues नावाचा स्वीडनहुन आलेला एक विदेशी पर्यटक भेटला. उंचगोरा, धिप्पाड ४० च्या आसपास असलेला. तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत भारतदर्शनला आला होता. उत्तरेत कुतुबमिनार वगैरे पाहून झाल्यावर आता गोव्याला आरामासाठी निघाला होता. सहज बोलता-बोलता त्याचं भारताविषयी असलेलं प्रेम कळून आलं. इथली लोक, त्याचं राहणीमान, खाद्य संस्कृती याचं त्याला विशेष कौतुक होतं. २० वर्षाचा असताना जेव्हा भारतात आलो होतो तिथपासून आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी बदलेल्या पाहायला मिळाल्या आणि इथे हि इकॉनॉमी वाढलेली असल्याने फिरणं थोडं खर्चिक झालाय असं तो सांगत होता. त्याची बॅग कुठेतरी प्रवासात हरवली तेव्हा ४ दिवस एकाच अंतर्वस्त्रांसह कसा फिरलो तिथं पासून ते सगळ्या छोट्या- छोट्या गोष्टींपर्यंत सर्व अगदी मनमोकळेपणाने सांगत होता. मी हि कुतुहुलाने त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. ४० व्या वर्षात हि गर्लफ्रेंडसोबत फिरताना आमच्याकडे लग्न हि गोष्ट बंधनकारक नाहीये. "तुम्ही कसं काय बुवा! आयुष्यभर बंधनात राहता" मला कौतुक वाटतं त्याचं "असं तो सांगत होता. – हीच तर आमची विशेषतः आहे. मी ही त्याला अगदी पुरब और पश्चिम मधल्या मनोजकुमारसारखं छातीठोक पणे भारताचं आणि महाराष्ट्रातल्या खाद्य संस्कृतीचं कौतुक सांगत होतो.
त्याला खरं तर साध्या एक्सप्रेसने प्रवास करायचा होता. ज्यामध्ये उघड्या असणाऱ्या दरवाजे- खिडक्या,त्यातून डोकं बाहेर काढून डोकावणं, मधूनच ओरडत येणारा चहावाला याचा त्याला आनंद घ्यायचा होता. पण तेजस एक्सप्रेसने त्याचा साफ भ्रमनिरास केला कारण जेव्हा बुक केलेली तेव्हा त्याला हे माहित नव्हतं कि भारतात अशी अद्ययावत रेल्वे असेल म्हणून. भारत हळूहळू कसा प्रगत होतोय याचं त्याला कौतुक होतं पण प्रगत झाल्यावर या जुन्या सुद्धा गोष्टी जपून ठेवल्या पाहिजेत हे हि तो सांगत होता. बऱ्याच गप्पा-टप्पा झाल्यावर निघता-निघता त्याची एक आठवण म्हणून त्याच्या सोबत एक झकास सेल्फी घेऊन त्याला निरोप दिला.
स्वच्छ, सुंदर , निळ्याशार पाण्याचे समुद्रकिनारे हि तर गोव्याची विशेषतः मग ते पाहिल्या शिवाय गोव्याचं पर्यटन सार्थकी कसं लागणार. म्हणून एक दिवस पूर्णपणे उत्तर गोव्यामधले कांदोळीपासून ते हरमल (Arambol ) पर्यंतचे सर्व समुद्रकिनारे आम्ही पहिले. त्यात विशेष वाटला तो vagator चा किनारा . छोटाश्या टेकडीवरून खाली उतरून जाणारा रस्ता आणि वरूनच दिसणारी नारळाची झाडे. मोठाले खडक आणि थोडासा चंद्रकोरी सारखा किनाऱ्याचा आकार अगदी फोटोसेशनसाठी उत्तम लोकेशन.



दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सप्तकोटेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. मुख्य शहराकडून आम्ही नार्वे गावाकडे जाणारा रस्ता पकडला. मुख्य रस्ता सोडल्यावर रस्त्यावरची वाहनांची वर्दळ कमी होत गेली आणि शांत गावामधील रस्ता सुरु झाला.  दुतर्फा असणारी झाडांची गर्दी , मधूनच एखादी नारळी-पोफळीची बाग आणि त्यातून डोकावणारी टुमदार घरे हे लक्षवेधक तर होतंच पण प्रवासाचा आनंदही वाढवत होतं. गोव्यामधील हा सर्व निसर्ग पाहताना नकळत बा.. बोरकरांच्या  "माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारीमधोनी घाट फुटती दुधाचे " या कवितेच्या ४ ओळी ओठात पुटपुटल्या.



थोड्याच वेळात आम्ही सप्तकोटेश्वर मंदिराजवळ पोहोचलो . त्याच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं आणि प्रवासाचा क्षीण क्षणार्धात दूर झाला.  कोंकण प्रांतातील ६ मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे.
काही साधूंनी दिवार बेटावर तपस्या करायला सुरुवात केली होती.  सप्तकोट म्हणजे ७ करोड वर्षानंतर भगवान शिवानी त्यांना दर्शन दिले आणि त्यांनी महादेवाजवळ याच गावात बसण्याचा वर मागितला आणि म्हणून याला नाव पडले सप्तकोटेश्वर अशी याची पुराणकथा आहे.




गोमंतक अर्थात गोवा हे एकेकाळी संपन्न अश्या कदंब राजवटीचा एक भाग होताश्रीसप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद" अशी बिरुदावली दिमाखात मिरवणाऱ्या १२ व्या शतकातील कदंबांचे हे तीर्थक्षेत्र.  १२व्या शतकात कदंब राजाने आपली पत्नी कमलादेवी साठी हे मंदिर बांधले अशी नोंद आहे१३५२ मध्ये बहामनी राजवट येऊन कदंबाचे हे राज्य जिंकल्यावर अनेक मंदिरांसोबत हे देखील उद्ध्वस्त झाले होते. १३६७ ला विजयनगरच्या राजाने हे राज्य जिंकल्यावर याचे पुनर्निर्माण केले. १५६० मध्ये पोर्तुगिजानी हल्ला करून उद्धवस्त केले आणि त्या जागी आपले चॅपल बनवले. हिंदू लोकांनी कसे तरी करून शिवलिंग वाचवले आणि त्यानंतर १६६८ मध्ये शिवाजीमहाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला ते आजतागायत व्यवस्थित उभे आहे. याचा इतिहास असा कि ,

गोव्याचा विजरई कोंदी द सांव्हिसेंन्त मृत्यू पावल्यावर राजांनी दुसऱ्यांदा गोव्यावर हल्ला करून पुन्हा गोवा घेण्याचा बेत केला होता त्या वेळेला राजांचा मुक्काम नार्वे गावी होता. त्या वेळेला राजे मोहिमेच्या गडबडीत आपले शिंवलिंग विसरले होते. मोरोपंतांनी चौकशी केल्यावर जवळच एक भग्न अवस्थेत शिवालय आहे असे कळले.  तेथील शिवलिंग पाहून त्यांना फार आनंद झाला पण देवालयावर छप्पर नव्हते. तेथील पुजार्याला विचारल्यावर मुसलमानी आणि पोर्तुगीज आक्रमणात हे कसे उध्वस्त झाले याची कथा राजांना कळली आणि त्यांचे मन विषण्ण झाले" माझा देव इथे भिजतो आहे आणि आम्ही हे पाहतो आहे"  . असे म्हणून त्यांनी मोरोपंतांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा सोडली.
मंदिराच्या डाव्या बाजूला हे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले अशी एका दगडी पाटीवर नोंद केलेली आपल्याला पाहायला मिळते.



थोडावेळ तिथे विश्रांती घेऊन तिथे सध्या पौरोहित्य करणाऱ्या खांडेकर गुरुजी यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आम्ही जुवे बेटावर जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
तिथून निघाल्यावरती आमचं नेटवर्क गेलं आणि GPS बंद झाला. आता आली पंचाईत! आजूबाजूला विचारावं तर कोणाला त्या किल्ल्याच नाव सांगितल्यावर नक्की सांगता येईना बरं इतिहासाबद्दल सांगावं तर ती ही फारशी कोणाला माहित नाही. शेवटी थोडं पुढे गेल्यावर एक मुलगा बाईकवर बसलेला दिसला . त्याच्याजवळ चौकशी केली. 
"इकडे २ किल्ले आहेत तुम्हाला नक्की कुठला पाहायचा आहे? संभाजी महाराजांनी मांडवी नदीमध्ये घोडे घातलेला तो पाहायचा का?" माझे डोळे एकदम चमकले. बस्स!!. नेमका मुद्दा पकडला त्याने. 
हा तोच !..तोच पाहायचा आहे.
"बरं मग एक काम करा इकडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने हमरस्ता पकडा आणि सारमानस फेरी लागेल तिने नदी ओलांडून पलीकडे जा."
आम्ही पुढे निघालो परंतु एका रस्त्याला पुन्हा फाटे फुटत होते त्यामुळे नेमका अंदाज येत नव्हता. थोडे पुढे गेल्यावर नेटवर्क मिळालं आणि उरलेलं अंतर फक्त १५ कि.मी. आहे हे कळल्यावर आम्ही सुसाट निघालो आणि थांबलो ते थेट सारमानसची फेरी आली तेव्हा.  


सारमानस फेरीतून दिसणारे मांडवी नदीचे विशाल पात्र
Add caption

समोरच मांडवी नदीचं विशाल पात्र होतं आणि तिथून पलीकडे जाण्यासाठी दर पंधरा मिनिटांनी फेरीची सोय होती. हि सर्व सेवा सरकार विनामूल्य देतं हे तिथल्याच एका माणसाकडे चौकशी केली तेव्हा कळलं.  त्यानेच आम्हाला तिकडून परत न येता तिथूनच पुढे जुन्या गोव्यामधून तुम्ही बाहेर पडा जेणेंकरून तुमचा वेळ खूप वाचेल असा मौलिक सल्ला दिला. ज्यामुळेच आम्हाला वेळेत पोहोचणं शक्य झालं होत.




सान्तइंस्तेव्हाम (St.estevam) हा किल्ला पणजीपासून साधारण २३ कि.मी अंतरावर आहे. यालाच जुवे बेट असे सुद्धा ओळखले जाते. juva, Tolto & vantso हे तीन बेट एका कालव्याने जोडले गेले आणि ते St.estevam बेट म्हणून ओळखले जाते. संत. फ्रॅंसिस झेव्हिअर यांच्या नावावरून या किल्ल्याला हे नाव दिले गेले किंवा याला जुव्याचा किल्ला असेही ओळखतात. इथून नार्वे, दिवार आणि डिचोली (बिचोलिम ) येथील जवळच्या परिसरावर तसेच मांडवी नदीवरच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यास सोपे जाते असल्याने त्या युगात या किल्ल्याला विशेष महत्व होते.
याच्याशी संबंधित एक विशेष घटना ऐकिवात आहे कि, गोव्यावर नितांत प्रेम असणारा एक नावाडी जहाजावर जाण्याच्या आधी नियमितपणे इथे प्रार्थना करीत असे आणि त्याला या किल्ल्यावरून गोव्याचा परिसर पाहायला फार आवडत असे.

सान्तइंस्तेव्हाम किल्ल्यावरून  दिसणारा परिसर 
Add caption


१६ व्या शतकाच्या शेवटला या बेटावर धर्मांतर झाले. संभाजी महाराजांनी हल्ल्या केल्यानंतर या किल्ल्यावर जाळपोळ झाली होती त्यात मूळ चर्च उद्दवस्त झाले होते आताचे सध्याचे दिसणारे चर्च हे १७५९ साला पुन्हा: बांधलेले आहे.
किल्ला तसा छोटा आहे किल्ल्याची असणारी तटबंदी आणि चर्च सोडून फारसे काही पाहण्यासारखे नाही. वरून मांडवी नदी आणि आसपासचा परिसर मात्र फार छान दिसतो. पावसाळ्यात तर नक्कीच याचे सौंदर्य हे खुलून येत असणार. वरून चारही बाजूनी वाहणारी मांडवी नदी पाहून मला इतिहासाची आठवण झाली. शंभूराजांचा पराक्रम डोळ्यासमोर तरळू लागला.
व्हॉईसरॉय कौट दि आल्व्होरच्या ३००० पायदळाचा राजांनी अक्षरशः चुरा केला होता. भरलेली मांडवी नदी हि त्याची साक्ष होती.
२५ नोव्हेंबर १६८३ ला पोर्तुंजगीजानी गोवा जिंकला होता. त्याचा महोत्सव चालू होता. गोव्याच्या ईशान्येला फक्त २ मैलांच्या अंतरावर जुन्या गोव्याच्या उत्तरेस मांडवी नदीला २ फाटे फुटत होते. त्याच्या एका प्रवाहाच्या काठावर जुवे बेटावर पोर्तुगिजांचा सांत इंस्तेव्हाम किल्ला उभा होता. किल्ल्याची तटबंदी उंच आणि त्याचे बांधकामही मजबूत होते. आदल्या रात्रीपासूनच राजांची फौज आजूबाजूच्या झाडीत दबा धरून बसली होती.

रात्री दहा वाजता ओहोटी सुरु झाली मांडवीचे पात्र उघडे पडू लागले आणि शंभूराजांच्या सुसाट वेगाने घोडा फेकत पुढे धावले. पाठोपाठ मराठे नदी पार झाले. ऐन रात्री किल्ल्याला गराडा घातला आणि तटबंदीला शिड्या लावून मावळे वर गेले. खंडो बल्लाळांनी पराक्रमाची शर्थ केली आणि अर्ध्या तासातच किल्ला ताब्यात घेतला.
शंभू राजांच्या नेतृत्वाखालील मराठे 'हरहरमहादेव' च्या रण गर्जना करीत मागून येऊन फिरंग्यावर आदळले. त्याचा आवेश इतका जबरदस्त होता कि, त्याची सरळ अंगावर धावून येणारी घोडी पाहून फिरंग्यांनी धूम ठोकली आणि मांडवीच्या पात्रात पटापट उड्या घेऊ लागले. व्हॉईसरॉयचा पाठलाग करताना मांडवी नदीची भरती सुरु झाली होती.  आपल्या वस्त्रांची पर्वा न करता फिरंगी नदी ओलांडायचा आणि जीव वाचवायचा प्रयत्न करत होते.

व्हॉईसरॉयचे नशीब थोर म्हणून त्याला बसायला एक मचवा मिळाला आणि तो पात्र ओलांडून पुढे गेला. शत्रू हातातून निसटून चला आहे हे पाहून शंभूराजे चवताळले, वीरश्रीच्या भावनेने त्यांनी आपला घोडा भरल्या नदीत सोडला. पण पाण्याच्या लोंढ्याने घोड्याच्या नाकपुड्यात पाणी गेले आणि घोडा एका बाजूला कलंडला आणि राजेही खाली घसरले; पाण्यात बुडाले दुर्दैवाने त्यांचा एक पाय घोड्याच्या रिकिबी मध्ये अडकला .गर्दीतून खंडोबल्लाळने दृश्य पहिले. ते पाहताच खंडोजीच्या धमन्यांतून वाहणारे स्वामीभक्तांचे रक्त उसळले "राजे..राजे" असे किंचाळत त्याने पाखऱ्या नावाचा आपला घोडा ही पाण्यात फेकला. खंडोजीने पाण्यात उडी घेतली .राजे पट्टीचे पोहणारे होते पण पाय रिकिबीत अडकल्याने साराच नाईलाज होता. शंभूराजांनी सांगताच खंडोने रिकीब तोडली आणि पुढे झेप घेऊन दमछाक झालेल्या राजांना आपल्या बगलेचाच आधार देऊन वाचवले आणि राजांना जीवदान मिळाले तीच हि ऐतिहासिक जागा.
गोव्यावरच्या या जोरदार हल्ल्याने व्हॉईसरॉयने इतकी दहशत खाल्ली होती कि त्याने आपली राजधानी पणजीहुन मार्मा गोव्याला (आताचे मुरगाव) हलवायचा निर्णय घेतला होता.
अशी हि ऐतिहासिक जागा पाहण्याची इच्छा आज पूर्ण झाली होती. समाधानाने खाली उतरलो.
परतीच्या प्रवासासाठी आम्ही जुन्या गोव्याचा रस्ता पकडला आणि थोड्याच वेळात जुन्या गोव्यात दाखल झालो ते "बॉमगेसू चर्च" पाहण्यासाठी. "बॉमगेसूचर्च" (Basilica of Bom Jesus) हा जुन्या गोव्यातील सेंट फ्रान्सिसझेविअर यांचा असलेला प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चर्च; ज्याला पाहण्यासाठी अनेक देश विदेशातील पर्यटक गोव्याला आल्यावर हमखास भेट देतात.हा तोच चर्च जिथे "व्हॉईसरॉय कौंट दि आल्व्होर गोव्यावर आलेले संभाजीराजांचे संकट दूर व्हावे म्हणून घाबरून सतत २२ दिवस सेंटझेविअरची करुणा भाकत होता.










चर्च आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहून आम्ही तिथून निघालो. 
मी आणि सचिन आम्ही दोघांनीही फक्त एका लिंबू पाण्यावर राहून दिवसभराचा हा साधारण १२० कि.मी. चा प्रवास पूर्ण केला होता. झपाटल्यासारखे या स्थळाला भेट देण्यासाठी आसुसले होतो. 
झपाटल्यासारखे या स्थळाला भेट देण्यासाठी आसुसले होतो. त्याचं सार्थक झालं होतं. याजसाठी केला होता अट्टहास !
रात्री निघताना तिथल्या गोवन करीचा आस्वाद घेऊन आम्ही गोव्याचा निरोप घेतला आणि एका सुंदर प्रवासाचा शेवट झाला.


इतिहास संदर्भ: "संभाजी " -- विश्वास पाटील



सान्तइंस्तेव्हाम किल्ल्याचे अवशेष:










Note:-  This article has been published in 6th july 2018 lokprabha magazine.
http://epaper.lokprabha.com/1714836/Lokprabha/06-07-2018#page/64

समर्थांची शिवथरघळ

समर्थांची शिवथरघळ






कसे जाल:- महाडवरून बिरवाडी मार्गे किंवा पुण्याहून वरंध घाटातून भोरमार्गे बारसगावपर्यंत येऊन मग आतमध्ये गेले कि शिवथरघळीच्या मार्गाला आपण लागतो. वरंध घाटातून माझेरी सुन्याभाऊची खिंड ह्या मार्गे पायी चालत देखील घळीत येत येते. तसेच राजगड गोप्याघाटाची खिंड, रायगड उतरून पोटाल्याच्या डोंगराकडून बिरवाडी मार्गे देखील घळीत येता येते.



शिवथरघळ एक अविस्मरणीय अनुभव




    शिवथरघळची भेट अशीच अचानक न ठरवता झाली. दरवर्षी मामाकडे (माणगावला) जातो . या वर्षीहि गणपतीला मामाकडे गेलो असताना, भाऊ आणि मी दोघांनी शिवथरघळला भेट द्यायचे ठरवले, मग काय ! रेनकोट चढून Bike वर दोघेही स्वर झालो. निघताना फारसा पाऊस नव्हता. पण लोणेरे सोडल्यानंतर मात्र पावसाने आपला रंग बदलला आणि धो-धो सारी कोसळायला सुरुवात झाली. Bike वर असल्याने पावसाच्या सरी काट्याप्रमाणे चेहऱ्याला टोचत होत्या, पण त्यात सुद्धा मजा वाटत होती.

हळू हळू करत आम्ही महाड सोडले आणि काही अंतरावर गेल्यावर मुख्य महामार्गावरून left turn मारून शिवथर च्या मार्गाला लागलो. एव्हाना महाड शहरापासून बरेच अंतर कापले होते, आजूबाजूला हिरव्यागार निसर्गाचे अप्रतिम दर्शन होत होते. थोड्यावेळाने ढालकाठी गावाजवळ पोहोचलो आणि समोर एका अप्रतिम धबधब्याचे दर्शन झाले. इतका सुंदर आणि सुरक्षित धबधबा मी आजवर पहिला नव्हता. पण तिथे जास्त वेळ घालवून चालणार नव्हता, लगेच आम्ही पुढे मार्गस्थ झालो. वाटेत दिसणारया ,सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा,त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारे असंख्य छोटे –मोठे धबधबे, सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू सर्व काही अवर्णनीय होते.

     


    हे सर्व सौंदर्य हावरया सारखे नजरेत जितके सामावेल तितके सामावून घेत होतो. अजून बरेच अंतर होते, आता तर गावेही दिसेनाशी झाली होती. पावसाचा जोर वाढतच होता. बाजूने वाहणारी नदी रस्त्याला स्पर्श करू पाहत होती.

आणखी तासभर जर असाच पाऊस पडला तर रस्ता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे कुठे हि वेळ न घालवता थेट शिवथरघळ गाठायचे ठरवले. थोड्याच वेळात आम्ही पवित्र ठिकाणी अर्थातच शिवथरघळला पोहोचलो. वरती पोहोचण्यासाठी पायऱ्यांची उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था आहे.









समोर तो महाकाय, अजस्त्र धबधबा बघानारयाच्या मनात धडकीच भरवतो. कारण ऐन पावसाळ्यात येथील धबधबा रौद्र रूप धारण करतो. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. त्याचे आवाजाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो. त्या पाण्याचा प्रवाह एवढा आहे कि घळीपर्यंत जाताना तो आपल्याला जाणवतो. त्याच्यामुळे एक लहानशी नदीच तयार झाली होती. त्याला लागूनच समर्थांची घळ आहे. दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. 










समर्थांच्या जीवनात घळींना फार महत्व आहे. आपल्या जीवनातला बराचसा काळ समर्थांनी ह्या घळींमध्ये व्यतीत केला आहे. समर्थ संप्रदायामध्ये या घळींना विशेष महत्व आहे.


मनुष्य सरपटत, रांगत किंवा उभा राहून आतमध्ये जाऊ शकेल असे जमिनीतील किंवा डोंगरातील एक नैसर्गिक विवर म्हणजे घळ. घळ म्हणजे नैसर्गिक गुहा किंवा गुंफा.

     


      समर्थांच्या साधारण ८ घळी मला माहिती आहेत.

हेळवाकची घळ, तारळे(तोंडोशी) घळ, मोरघळ, सज्जनगडची रामघळ, चाफळची रामघळ, चंद्रगिरीची घळ, जरंडेश्वराची घळ आणि दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ.

त्यातील शिवथरघळ दर्शनाचे भाग्य मला आज लाभले होते.


दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. समर्थांनी सांगावे, कल्याण स्वामींनी लिहावे. असा हा गुरुशिष्य संवादरूपाने ७७५१ ओव्या, २०० समास व २० दशके असलेला ग्रंथराज दासबोध हया घळीतच सिद्ध झाला. दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ४०-५० फुट उंचीवरून कोसळणारा तो महाकाय धबधबा,घनदाट जंगल, निर्मनुष्य वस्ती, आजूबाजूला सह्याद्रीचे उंचच उंच कडे. अश्या वातावरणात समर्थांनी दासबोधासारखा महान जीवनग्रंथ लिहिला. पावसाळ्यात तर घळीचे सौंदर्य फारच खुलून दिसते.

समर्थांच्या शब्दातच आपण शिवथरघळीचे वर्णन पाहू —

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालली बळे |

धबाबा लोटल्या धारा | धबाबा तोय आदळे ||१||

गर्जती मेघ तो सिंधू |ध्वनी कल्लोळ उठला |

कडयासी आदळे धारा |वात आवर्त होतसे ||२||

समर्थांनी या घळीला सुंदरमठ हे नाव दिले होते.
सुंदर मुर्ती सुंदर गुण | सुंदर कीर्ती सुंदर लक्षण

सुंदरमठी देवे आपण | वास केला ||

सुंदर पाहोन वास केला |दास सन्निध ठेवला |

अवघा प्रांतची पावन केला |कृपा कटाक्षे ||

दरे कपारी दाते धुकटे |पाहो जाता भयची वाटे |

ऐसे स्थळी वैभव दाटे | देणे रघुनाथाचे ||


आत घळी मध्ये श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना केली आहे.


रामदास स्वामी घळ सोडून गेल्यानंतर तिचे महत्व कमी होत गेले आणि ती जणू काळाच्या पडद्याआड गेली होती. कागदोपत्री इ.स.१७४१ साली दिवाकर गोसाविचे नातू दिवाकर ह्याने घळीत राहून ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतानुभवाची प्रत केली होती असा उल्लेख सापडतो. त्यानंतर १९३० साली शं. श्री. देव ह्यांनी हि घळ शोधून काढली असे समजते.

९ जानेवारी १९५० ला समर्थ सेवा मंडळ स्थापन झाल्यानंतर श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना प.पु. श्रीधर स्वामींच्या हस्ते करण्याचे ठरले.त्याप्रमाणे माघ शुद्ध अष्टमी शके १८८१ (१९६०) या दिवशी मूर्ती स्थापन झाली व माघ शुद्ध नवमीला दासबोध त्रिशत सांवत्सारिक जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. एवढी साधारण माहिती मला शिवथरघळ बददल होती.

बाजूला भक्तांसाठी राहण्याची सोय आहे तसेच वर्ष भर चालणाऱ्या कार्यक्रमांची याधी हॉल भर लावलेली होती.

     
  

    या पवित्र स्थानाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी मद्यपीनि प्रवेश करू नये अशी पाटीच प्रवेशद्वारावर लावलेली आहे. संपूर्ण परिसराचे एकदा मन भरून दर्शन घेतले, आज मन तृप्त झाले होते, एवढ्या वर्षांची कमान आज पूर्ण झाली होती. समर्थना एकदा त्रिवार वंदन करून त्या पवित्र स्थानाचा निरोप घेतला.



|| जय जय रघुवीर समर्थ ||





© Mayur H.Sanap 2011