सुरगड ची सुरस्य भ्रमंती

सुरगड ची सुरस्य  भ्रमंती



रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचे आगार. नाशिक नंतर सगळ्यात जास्त किल्ले असणारा आणि रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचे आगार. नाशिक नंतर सगळ्यात जास्त किल्ले असणारा आणि स्वराज्याच्या राजधानीवरून नामकरण झालेला हा जिल्हा. तब्बल ५० किल्ल्यांचे वरदान लाभलं आहे या जिल्ह्याला. या पैकीच एक सुरगड|रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील एक अप्रचलित किल्ला.


सुरगड चा उभा कातळकडा 
मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड ला जाताना खांब गावाच्या पाठीमागे नेहमी एक उभा डोंगराचा कातळकडा दिसायचा. लहानपणी त्याचे खूप आकर्षण वाटायचे पण त्याच्याच डोंगररांगेत एक किल्ला वसला असेल असं तेव्हा कधी वाटलं नव्हतं. नंतर गड-किल्ले फिरायला लागल्यानंतर कळलं कि आपल्या गावा जवळच एक सुंदर किल्ला आहे. ज्याची फारशी कोणाला माहिती नाही.  या वर्षीच्या पावसाळ्यातील गड-भ्रमंतीची सुरुवात त्यानेच करायची अस ठरवलं.
मुंबई-गोवा महामार्गाच्या अगदी जवळचा आणि आपल्या कातळकडयामुळे लांबूनही लक्ष वेधणारा आणि खास पावसाळयात भेट देण्याजोगा असा हा किल्ला.
प्राचीन काळापासून कुंडलिका नदीतून व्यापार चालायचा. घाटमार्गावर जाणाऱ्या बाजारपेठेतील व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. नदितून तीच्या खोर्‍यातून जाणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली गेली. खांब गावाजवळील घेरासुरगडवाडी जवळ असलेला सुरगड हा महत्वपूर्ण गड याच साखळीत आहे. शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये केलेल्या कोकणच्या मोहिमेत सुधागड, सरसगड, तळगड,घोसाळगड आणि सुरगड देखील होता. त्यांनी जे १११ किल्ले वसविले होते त्यात सुरगड देखील होता.
एकदाची सुरगडची मोहीम ठरली आणि नेहमीप्रमाणे मी नितेश आणि आमच्यासोबत  आणखी 3 सवंगडी गोपाल, शुभम आणि गुरु तयार झाले. मी डोंबिवली वरून येई पर्यंत सगळेजण नागोठणे या गावाजवळ थांबणार होते आणि तिथून मग एकत्र पुढे जायचं असं ठरलं. रविवारी सकाळी पहाटेच निघालो. स्टेशनला आल्यावर कळलं सेंट्रल रेल्वे ची बोंबाबोंबआहे. त्यामुळे मला दिव्यावरून जाणारी सावंतवाडी पॅसेंजर भेटणार नव्हती. सकाळ सकाळ डोक्याला शॉट लागला होता. माझ्यासाठी सगळे जण थांबणार असल्याने उशीर करून चालणार नव्हतं. शेवटी “वाट पाहीन पण एस.टीनेच जाईन.” या ब्रीदवाक्या प्रमाणे आपली एस.टी चं वेळेला कामी आली. साधारण ९.१५ ला मी नागोठणेला पोहोचलो. तिथून आम्ही सगळे एकत्र निघालो. आज नेमकी पावसाने सुरुवात केली होती. बाईकवरून पावसाच्या धारा या सुईप्रमाणे टोचत होत्या. थोड्याच वेळात आम्ही खांब गावाजवळ आलो. ट्रेकला गेल्यावर वडा-पाव नाही खाल्ला तर मग काय नवलचं! गावच्या टपरीवरच्या वडा-पावची चव तर स्टार हॉटेल मधल्या बर्गर ला सुद्धा येणार नाही. महामार्गालगतच असलेल्या एका हातगाडीवर सगळयांनी वडा-पाव वर यथेच्छ ताव मारला आणि मग तिथून आम्ही घेरा-सुरगड ला जाण्यासाठी खांब गावातून प्रवेश केला.
खांबच्या पूर्वेला १.५ -२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वैजनाथ गावाच्या पाठीमागे असणाऱ्या डोंगर रांगेवर घेरा-सुरगड आहे. पायथ्याशीच असणाऱ्या घेरा-सुरगड वाडीपर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. इथेच बहुसंख्येने पार्टे कुटुंबियांची घरे असणारी वाडी आहे. तिथेच अंगणवाडी जवळ आम्ही आमच्या दुचाकी गाड्या लावल्या आणि तिथून दोन घरांच्या मधून एका गल्लीतून किल्ल्याकडे जाणारी वाट होती, तिथूनच आम्ही खाली उतरलो. आमचा म्होरक्या म्हणून नितेश ला पुढे केला आणि एका मागोमाग एक आम्ही गडाची वाट चालू लागलो. घेरा सुरगड ते गडाचा पायथा ही साधारण अर्धापाउण तासाची चाल आहे. वाटेत एक फार मोठी विहीर लागली तिथूनच आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. शेतीचा भाग जाऊन आता जंगलाचा रस्ता सुरु झाला होता. सुरगडच्या या गर्द झाडीतून चालत असताना समोरच आम्हाला डोंगरची काळी मैना (करवंद) दिसली मग काय! मी आणि गोपाल ने तिच्यावर चांगलाच ताव मारला. “ ये देखो ये जो हम खा रहे है | इससे हमे बहोत प्रोटीन मिलता है” असा Bayer Grill चा मिश्कील डायलॉग मारत आम्ही पुढे निघालो. 






एका टप्प्यावर आल्यावर एक मार्ग अनसाई देवी कडे आणि दुसरा घळीतून वर गडाकडे जाणाऱ्या वाटेकडे जात होता. हा मार्ग सगळ्यात जवळचा असला तरी थोडा अवघड आहे. आमच्या अगोदर मुंबईहून आलेली काही हौशे-नवशे रोप लावून तो कातळकडा चढायचा प्रयत्न करत होते.पण त्यांची काही हिम्मत होत नव्हती. बराचवेळ तिथेच रेंगाळत बसलेले वाटत होते. त्या कातळात खोदलेल्या जेमतेम २-३ इंचाच्या पायऱ्या .. धरायला नीट खोबण्याहि नव्हत्या अश्याचा आधार घेऊन वर जावे लागणार होते. तसे पाहायला गेलात तर फक्त ५ मिनिटांचं अंतर ;पण सतत पडणाऱ्या पावसामुळे घसरण्याची भीती वाटत होती आणि ते पार करणं म्हणजे एक थ्रिलच होतं . नितेश ने धीर दिला आणि मग मी आणि शुभम ने तो अवघड टप्पा बिना दोराच्या साहाय्याने पार केला.  नितेश तर आता पक्का ट्रेकर झाला होता. त्याने ते अंतर लीलया पार केलं. आम्हाला पाहून मुंबईहून आलेल्या मंडळींनाही थोडा धीर आला. “See yaar! this guys are going without any rope; come you can do it” असं म्हणून त्यांच्यातला एक आपल्या सहचारिणीला धीर देत होता.


सुरगड चा अवघड  टप्पा 


वर पोहोचल्यावर लगेचच उजव्या हाताला मारुतीरायाची सुंदर मूर्ती दिसली. पिळदार मिशा, कमरेला खंजीर आणि रामदासांनी वर्णन केल्याप्रमाणे "पुच्छ ते मुरडिले माथा" असलेली ही आगळ्या वेगळ्या रूपातील मूर्ती कायम लक्षात राहण्यासारखी आहे. गडावर कुठेही गेलो कि तिथल्या गड्देवतेला दिवा-बत्ती करायची हा माझा शिरस्ता तोआम्ही इथेही पार पडला. मारुतीरायासमोर दिवा-बत्ती करून आम्ही पुढे निघालो. उजवीकडच्या वाटेने गेलो, कि घेरा सुरगड गावाकडे तोंड करून उभा असलेला एक बुरुज आहे. तो पाहून आम्ही पुढे निघालो. सुरगड हा  आला दक्षिणोत्तर पसरला आहे. वरून दक्षिण दिशेला नजर टाकली कि कुंडलिका नदीचे अर्धचंद्राकृती दिसते. अगदी पंढरपूर मधल्या चंद्रभागेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 


कुंडलिका नदी चे विहंगम दृश्य 
तिथेच थोडा वेळ विश्रांती घेतलीवरून दिसणाऱ्या कुंडलिकेचे आणि सभोवतालच्या हिरव्यागार निसर्गमय दृश्याने आम्ही सगळे मोहून गेलो होतोअवचितगडघोसाळगड हे किल्ले आणि पायथ्याचं टुमदार घेरा सुरगड गाव वरून छान दिसतं होतं . तिकडेच  पश्चिमेला कड्याला लागूनच पाण्याच्या काही  टाक्या आहेत. त्या पाहून आम्ही पुढे निघालो. वाटेत आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी सिंहासन सुद्धा पाहायला मिळते. 


दगडी सिंहासन


Water Tank
Water Tank2


गडमाथ्यावर गेल्यावर  किल्ल्यावरील कोठार, भग्नावस्थेतील हेमाडपंती मंदिर, पाण्याची टाकी, सदर आदी वास्तू आपल्याला दिसतात. या गडावर एक अवाढव्य बांधणीचा बुरूजही आहे तो हि आपल्याला दिसतो. हे सगळं पाहत असतानाच गडाच्या माचीवर  एक  शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. हा शिलालेख आवर्जून पाहण्यासारखा आहे. अरबी देवनागरीत कोरलेल्या या शिलालेखानुसार सिद्दीसाहेब नावाच्या माणसाच्या हुकमावरून सूर्याजी याने हा किल्ला बांधला. या वेळी तुकोजी हैबतराव गडाचे सुभेदार होते. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला. त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते. कर्नल प्रॉथरने १८१८ साली किल्ल्याचा ताबा घेतल्याची इतिहासात नोंद आहे. सुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा असा अंदाज आहे.

शिलालेख 

पुढे असलेला  ढालकाठी नावाचा एक बुरुज आहे आणि त्याच्याच खाली एक पाण्याच्या टाकं आहे. तिथून समोरच्या डोंगरावर एक समाधी सारखा छोटा ठिपका मला दिसला. "अरे ! ते बघ तिकडे एक समाधी दिसते कोणाची तरी ..परंतु मध्ये हि दरी आहे.."
"चला मग जाऊया.. येऊ आपण बघून " गुरु म्हणाला.



सतीची समाधी



परंतु समोरचा डोंगर एका छोट्याश्या दरीने अलग झाला होता. गुरूने मात्र हट्ट धरला कि आपण जाऊच ती पहायला; मिळेल कुठेतरी रस्ता!  क्षणभर आम्ही सगळ्यांनी विचार केला कारण सतत पडणारा जोरदार पाऊस आणि वाट नाही मिळाली तर परत हरवण्याची भीती म्हणून हो नाही करत असताना गुरु ने पुढे जाऊन रस्ता शोधलासुद्धा आणि आम्ही मग सगळे त्याच्या पाठोपाठ त्या दरीतून पार करत समोरच्या डोंगरावर चढलो आणि ती समाधी पाहली. ती एका सतीची समाधी आहे हे नंतर आम्हाला एका गावकऱ्यांकडून कळलं.  पुढे तसाच पठारावरून आम्ही पुढे चालत गेलो आणि एका मोकळ्या कातळावर मस्त पैकी एक जागा बघून सोबत आणलेल्या शिदोरीवर सगळ्यांनी मस्त पैकी ताव मारला.  आता परतीच्या प्रवासासाठी परत एवढ्या मागे जाण्यापेक्षा एकडूनच एखादी वाट शोधुया म्हणून आम्ही तसेच पुढे चालत राहिलो काही ठिकाणी दगडावर असलेले दिशादर्शक बाण मधेच गायब झाले आता मात्र कुठे तरी भलतीकडेच आपण जाऊ त्यापेक्षा आलो त्याच वाटेने आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. मग पुन्हा हा डोंगर उतरून त्या दरीतून अंतर पार करत आम्ही सुरगडच्या मुख्य डोंगर पठारावर आलो. धुवाधार पाऊस , सतत वाहणारा वारा, असणारे धुके आणि त्या दरीतून चाललेली ढगांची पकडापकडी  असे त्या दोन डोंगरांमधील असणाऱ्या दरीतून दिसणारे दृश्य म्हणजे स्वर्गसुखच होत. सह्याद्रीची हीच तर खरी विशेषतः आहे.
पुन्हा आम्ही  त्या घळीच्या अवघड टप्प्यावर आलो आता आली का पुन्हा उतरायची पंचाईत!! .. एकवेळ आपल्याला चढताना काही वाटत नाही पण अश्या अवघड टप्प्यावर आल्यावर उतरताना मात्र लागते. गुरु २ मिनिटात उतरून गेला खाली. तशी गुरुची आणि माझी या ट्रेक साठी प्रथमच भेट झाली होती. तो तर अनवाणी पायानेच ट्रेक करत होता. अगदी पक्का ट्रेकर, शांत पण तितकाच धाडसी स्वभावाचा. तो तर बॅग मध्ये रोपच घेऊन आला होता कुठे  गरज लागली तर ; मग नितेश च्या सहाय्याने मी आणि शुभम ने तो अवघड टप्पा पुन्हा सहज पार केला नि उतरून पुढे निघालो.
खाली उतरल्यावर अनसाई देवीच्या मंदिराजवळ आलो सोबत आणलेले दिवा-बत्तीचे सामान आता पूर्णपणे भिजून गेलं होतं त्यामुळे इथे काही दिवा लावता आला नाही. फक्त दर्शनाचा लाभ घेतला. तिथेच बाजूला एक तोफ ठेवलेली आहे. ती पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 


अनसाई देवीचे मंदिर 



थोडे पुढे गेल्यावर आम्हाला जाणवले कि आपण परत दुसरीच वाट पकडली हि वाट घनदाट जंगलातून जात होती. काही केल्या रस्ता संपतच नव्हता. "अरे चकवा तर नाही लागला ना ??" मी बोललो.
"अरे प्रत्येक जंगलात चकवा हा असतोच.. घाबरायचं नाही आपण मग काही होत नाही चाल पुढे.. "गुरूने पाठीमागून मला सांगितले.
मग आम्ही मात्र तसेच पुढे पुढे चालत राहिलो. या वाटेवर आम्हाला एका भल्या मोठ्या वानरांच्या जोडीने दर्शन दिले. अधून मधून मोरांचा कानावर आवाज पडत होता. गावाला वटपौर्णिमेला पानात आवर्जून ठेवले जाणारे "अळूचं" फळ हे कितीवेळा खाल्लं होतं. पण त्याचं झाड मात्र इथे पहिल्यांदाच पाहायला मिळालं होतं मला. यावरूनच सुरगडची वनसंपदा हि किती विपुल प्रमाणात आहे हे इथे आल्यावर जाणवत होतं. थोडे पुढे गेल्यावर एक काका आम्हाला लाकडाची एक मोळी घेऊन जाताना दिसले मग त्यांनीच सांगितले असेच पुढे खाली डाव्या बाजूने जा. मग तुम्ही उतराल खाली. त्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात आम्ही खाली पोहोचलो. आणि सगळ्यांना हायसे झाले.

किल्ल्याचा पसारा तसा लहान असल्याने तासाभरात किल्ला बघून पूर्ण होतो. परंतु नवीन वाट शोधण्याच्या नादात आमचा मात्र चांगलाच २० कि. मी. चा जंगल ट्रेक झाला होता. ते काहीही असलं  तरी, वर्षांऋुतुचा खरा आनंद हा सुरगडासारख्याच आडवाटेवरच्या पण देखण्या किल्ल्यांमध्ये सामावला आहे. आजही तुम्ही गेलात तर सुरगडाचे ते देखणं पावसाळी रूप तुमच्यावर जादू करेल आणि शरीरानं तुम्ही तिथे नसलात तरी मन तिथेच ठेवून जायला भाग पाडेल.