समर्थांची शिवथरघळ

समर्थांची शिवथरघळ






कसे जाल:- महाडवरून बिरवाडी मार्गे किंवा पुण्याहून वरंध घाटातून भोरमार्गे बारसगावपर्यंत येऊन मग आतमध्ये गेले कि शिवथरघळीच्या मार्गाला आपण लागतो. वरंध घाटातून माझेरी सुन्याभाऊची खिंड ह्या मार्गे पायी चालत देखील घळीत येत येते. तसेच राजगड गोप्याघाटाची खिंड, रायगड उतरून पोटाल्याच्या डोंगराकडून बिरवाडी मार्गे देखील घळीत येता येते.



शिवथरघळ एक अविस्मरणीय अनुभव




    शिवथरघळची भेट अशीच अचानक न ठरवता झाली. दरवर्षी मामाकडे (माणगावला) जातो . या वर्षीहि गणपतीला मामाकडे गेलो असताना, भाऊ आणि मी दोघांनी शिवथरघळला भेट द्यायचे ठरवले, मग काय ! रेनकोट चढून Bike वर दोघेही स्वर झालो. निघताना फारसा पाऊस नव्हता. पण लोणेरे सोडल्यानंतर मात्र पावसाने आपला रंग बदलला आणि धो-धो सारी कोसळायला सुरुवात झाली. Bike वर असल्याने पावसाच्या सरी काट्याप्रमाणे चेहऱ्याला टोचत होत्या, पण त्यात सुद्धा मजा वाटत होती.

हळू हळू करत आम्ही महाड सोडले आणि काही अंतरावर गेल्यावर मुख्य महामार्गावरून left turn मारून शिवथर च्या मार्गाला लागलो. एव्हाना महाड शहरापासून बरेच अंतर कापले होते, आजूबाजूला हिरव्यागार निसर्गाचे अप्रतिम दर्शन होत होते. थोड्यावेळाने ढालकाठी गावाजवळ पोहोचलो आणि समोर एका अप्रतिम धबधब्याचे दर्शन झाले. इतका सुंदर आणि सुरक्षित धबधबा मी आजवर पहिला नव्हता. पण तिथे जास्त वेळ घालवून चालणार नव्हता, लगेच आम्ही पुढे मार्गस्थ झालो. वाटेत दिसणारया ,सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा,त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारे असंख्य छोटे –मोठे धबधबे, सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू सर्व काही अवर्णनीय होते.

     


    हे सर्व सौंदर्य हावरया सारखे नजरेत जितके सामावेल तितके सामावून घेत होतो. अजून बरेच अंतर होते, आता तर गावेही दिसेनाशी झाली होती. पावसाचा जोर वाढतच होता. बाजूने वाहणारी नदी रस्त्याला स्पर्श करू पाहत होती.

आणखी तासभर जर असाच पाऊस पडला तर रस्ता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे कुठे हि वेळ न घालवता थेट शिवथरघळ गाठायचे ठरवले. थोड्याच वेळात आम्ही पवित्र ठिकाणी अर्थातच शिवथरघळला पोहोचलो. वरती पोहोचण्यासाठी पायऱ्यांची उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था आहे.









समोर तो महाकाय, अजस्त्र धबधबा बघानारयाच्या मनात धडकीच भरवतो. कारण ऐन पावसाळ्यात येथील धबधबा रौद्र रूप धारण करतो. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. त्याचे आवाजाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो. त्या पाण्याचा प्रवाह एवढा आहे कि घळीपर्यंत जाताना तो आपल्याला जाणवतो. त्याच्यामुळे एक लहानशी नदीच तयार झाली होती. त्याला लागूनच समर्थांची घळ आहे. दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. 










समर्थांच्या जीवनात घळींना फार महत्व आहे. आपल्या जीवनातला बराचसा काळ समर्थांनी ह्या घळींमध्ये व्यतीत केला आहे. समर्थ संप्रदायामध्ये या घळींना विशेष महत्व आहे.


मनुष्य सरपटत, रांगत किंवा उभा राहून आतमध्ये जाऊ शकेल असे जमिनीतील किंवा डोंगरातील एक नैसर्गिक विवर म्हणजे घळ. घळ म्हणजे नैसर्गिक गुहा किंवा गुंफा.

     


      समर्थांच्या साधारण ८ घळी मला माहिती आहेत.

हेळवाकची घळ, तारळे(तोंडोशी) घळ, मोरघळ, सज्जनगडची रामघळ, चाफळची रामघळ, चंद्रगिरीची घळ, जरंडेश्वराची घळ आणि दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ.

त्यातील शिवथरघळ दर्शनाचे भाग्य मला आज लाभले होते.


दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. समर्थांनी सांगावे, कल्याण स्वामींनी लिहावे. असा हा गुरुशिष्य संवादरूपाने ७७५१ ओव्या, २०० समास व २० दशके असलेला ग्रंथराज दासबोध हया घळीतच सिद्ध झाला. दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ४०-५० फुट उंचीवरून कोसळणारा तो महाकाय धबधबा,घनदाट जंगल, निर्मनुष्य वस्ती, आजूबाजूला सह्याद्रीचे उंचच उंच कडे. अश्या वातावरणात समर्थांनी दासबोधासारखा महान जीवनग्रंथ लिहिला. पावसाळ्यात तर घळीचे सौंदर्य फारच खुलून दिसते.

समर्थांच्या शब्दातच आपण शिवथरघळीचे वर्णन पाहू —

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालली बळे |

धबाबा लोटल्या धारा | धबाबा तोय आदळे ||१||

गर्जती मेघ तो सिंधू |ध्वनी कल्लोळ उठला |

कडयासी आदळे धारा |वात आवर्त होतसे ||२||

समर्थांनी या घळीला सुंदरमठ हे नाव दिले होते.
सुंदर मुर्ती सुंदर गुण | सुंदर कीर्ती सुंदर लक्षण

सुंदरमठी देवे आपण | वास केला ||

सुंदर पाहोन वास केला |दास सन्निध ठेवला |

अवघा प्रांतची पावन केला |कृपा कटाक्षे ||

दरे कपारी दाते धुकटे |पाहो जाता भयची वाटे |

ऐसे स्थळी वैभव दाटे | देणे रघुनाथाचे ||


आत घळी मध्ये श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना केली आहे.


रामदास स्वामी घळ सोडून गेल्यानंतर तिचे महत्व कमी होत गेले आणि ती जणू काळाच्या पडद्याआड गेली होती. कागदोपत्री इ.स.१७४१ साली दिवाकर गोसाविचे नातू दिवाकर ह्याने घळीत राहून ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतानुभवाची प्रत केली होती असा उल्लेख सापडतो. त्यानंतर १९३० साली शं. श्री. देव ह्यांनी हि घळ शोधून काढली असे समजते.

९ जानेवारी १९५० ला समर्थ सेवा मंडळ स्थापन झाल्यानंतर श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना प.पु. श्रीधर स्वामींच्या हस्ते करण्याचे ठरले.त्याप्रमाणे माघ शुद्ध अष्टमी शके १८८१ (१९६०) या दिवशी मूर्ती स्थापन झाली व माघ शुद्ध नवमीला दासबोध त्रिशत सांवत्सारिक जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. एवढी साधारण माहिती मला शिवथरघळ बददल होती.

बाजूला भक्तांसाठी राहण्याची सोय आहे तसेच वर्ष भर चालणाऱ्या कार्यक्रमांची याधी हॉल भर लावलेली होती.

     
  

    या पवित्र स्थानाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी मद्यपीनि प्रवेश करू नये अशी पाटीच प्रवेशद्वारावर लावलेली आहे. संपूर्ण परिसराचे एकदा मन भरून दर्शन घेतले, आज मन तृप्त झाले होते, एवढ्या वर्षांची कमान आज पूर्ण झाली होती. समर्थना एकदा त्रिवार वंदन करून त्या पवित्र स्थानाचा निरोप घेतला.



|| जय जय रघुवीर समर्थ ||





© Mayur H.Sanap 2011





निसर्गरम्य सुधागड




पावसाळा सुरु झाला रे . . कुठे नेतोस का नाही आम्हाला मयुर .. ट्रेकिंग ला जाशील तेव्हा मला बोलावं हं नक्की! राजगड ला जाऊन आल्यापासून श्रीकांत ट्रेकिंग साठी खूप हौशी झाला होता. त्यात सचिनच हि सारखं चालू होतचं पावसाळा सुरु झाला मयुर अजून कुठे गेलो नाही आपण; काय करतोस काय? चल. आणि आमचा हेमंत काय नेहमी एका पायावर तयार. शेवटी सगळ्यांच्या सुट्ट्याचं  नियोजन करून एक दिवस शेवटी गुरुवारचा जायचा ठरवला. मी सुधागड ला जाऊया असे सुचवलं आणि सगळे जण तयार झाले.
प्रथम सकाळी पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे आणि मग सुधागड च्या वाटेला लागायचं अस नियोजन ठरलं .
मी, हेमंत, सचिन आणि श्रीकांत ; मजेत सांगायचं तर एक मार्गदर्शक, एक फोटोग्राफर, एक चालक आणि एक व्यवस्थापक असे आम्ही चार जण गुरुवारी सकाळी सुधागडला जाण्यासाठी निघालो.
सकाळ पासूनच मस्त पाऊस चालू होता. पनवेल सोडल्यानंतर जुन्या पुणे महामार्गाला लागल्यावर छोट्या छोट्या धबधब्यांनी दर्शन द्यायला सुरुवात केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडी आणि सतत चालू असणारा पाऊस मनाला सुखावून टाकत होता. पाली फाटा सुरु झाल्यावर गर्द झाडीचा परिसर सुरु झाला. पाली- खोपोली या मार्गावरून पावसाळ्यात सफर करायची मजा वेगळीच. याच परिसरात एक फाटा जातो तो उंबरखिंडी कडे जिथे महाराजांनी कारतलब खानाच्या ३५००० मुघल सैन्यचा पराभव केला होता तो ही आपल्या १००० मावळ्यांपैकी एकही न गमावता. त्याची रंजक माहिती सांगत आमची गाडी पुढे मार्गस्थ होत होती. थोड्याच वेळात आम्ही पालीला पोहोचलो. अतिशय मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असलेले रायगड जिल्ह्यातील हे गाव सह्याद्री मधील काही महत्वाच्या घाट वाटांच्या जवळ आहे. कोकणातून देशावर येण्यासाठी जे महत्वाचे मार्ग आहेत त्यापैकी एक हा पाली जवळून जातो. 
पाली चा बल्लाळेश्वर हा तर आमचा समस्त रायगड वासियांचे श्रद्धास्थान. त्यामुळे त्याच्या दर्शनाशिवाय मी पुढे जाणे शक्यच नाही. मंदिराच्या आवारात गेल्यावर पाठीमागच्या बाजूला उंच डोंगर आपल्याला दिसतो तो म्हणजे सुधागड चा जुळा भाऊ सरसगड. ज्याचा वापर त्यावेळेस टेहाळणीसाठी होत असे. त्याच्या कडे एक धावती नजर टाकून आम्ही मंदिरात प्रवेश केला. 
अष्टविनायकांमध्ये स्थान प्राप्त झालेला पालीचा बल्लळेश्वर सरगडाच्या पायथ्याशी एका प्रशस्त देवालयात विराजमान झालेला आहे. कुठलाही विशेष दिवस नसल्यामुळे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. दर्शन अगदी उत्तम झालं. मंदिरातील स्वच्छता, सुबकता आणि जुने बांधकाम हे आपल्या नजरेला भावल्याशिवाय राहत नाही. तसेही कोकणातल्या देवस्थानांची हि विशेषतः च अगदी कुठेही तळकोकणापर्यंत कुठल्याही देवळात जा! खास करून गणपतीच्या; तिथे तुम्हाला स्वच्छता आणि सुबकता हि दिसणारच. त्यामुळे दर्शन घेतल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटलचं पाहिजे. 
आजूबाजूचा शांत आणि रम्य परिसर पाहून श्रीकांत खूप सुखावून गेला होता आणि पुढच्या वेळेला मी माझ्या कुटुंब समवेत कुठेही गर्दीच्या ठिकाणी न जाता इथेच येईन असा जणू काही त्याने पणचं केला. प्रसन्न मनाने विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यावर आम्ही सुधागडच्या वाटेला लागलो.
ऐतिहासिक आणि धार्मिक अशी दोन्ही पार्श्वभुमी असलेला असा हा सुधागड-पाली चा परिसर. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. इथूनच जवळ ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा असे समजतात  पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या भोरपगड डोंगरावर केली असे मानतात. नंतर शिवकाळात महाराजांच्या पदस्पर्शाने याचे नामकरण सुधागड असे झाले. इ.स. १६४८ साली हा किल्ला राज्यात सामील झाला. तसेच गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर या गावातच संभाजी राजे  व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परळी गावात हत्तीच्या पायी दिले. शंभू राजांच्या चरित्रात आपल्याला याचा उल्लेख मिळतो.
सुधागडच्या पायथ्याशी असणाऱ्या ठाकूरवाडी जवळ आम्ही आमची गाडी ठेवली आणि तिथून पायवाटेने गडावर जाण्यास सुरुवात केली.  तिथूनच आमच्या सोबत आम्हाला आमचा एक नवा सोबती सुद्धा मिळाला. शाळेपासूनच एका श्वानाने आम्हाला साथ द्यायला सुरुवात केली. तो पुढे पुढे आणि आम्ही त्याच्या मागे. जणू तो आमचा मार्गदर्शक होता. बरोबर अचूक पायवाटेने तो आम्हाला घेऊन जात होता. बहुधा हा त्याचा रोजचाच रस्ता होता.





जवळपास अर्धा- एक तासाची पायपीट केल्यावर आपण एका अरुंद अश्या चढ असलेल्या वाटे जवळ येतो तिथून वरती जाण्यासाठी एका मजबूत शिडीची सोय केलेली आहे. तिचा आधार घेत आम्ही वरती पोहोचलो. तिथून दिसणारे दृश्य तर अप्रतिमच! डोळ्याचे पारणे फेडणारे होते. खाली असणारी खोल दरी, तिथून खाली उतरणारे ढग आणि समोरच्या धबधब्यामुळे निर्माण झालेली वळण वळण घेत जाणारी नदी . अहाहा ! सारं कसं एखाद्या चित्रकलेच्या तासाला काढलेल्या चित्रा प्रमाणे; पण वास्तवात असणारं.





आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा या उंक्तीची खात्री आपल्याला इथे अनुभवायला मिळते. आषाढ महिन्यातील बरसणारा पाऊस, सर्वत्र  पसरलेली हिरवी चादर आणि धुक्याचे साम्राज्य. याचा आनंद घेत , एखाद दोन सेल्फी काढत आम्ही मस्त चालत होतो. तर या सगळ्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात हेमंत मग्न होता. एवढ्या पावसात फक्त वॉटरप्रूफ कॅमेराच चालू शकतो आणि हेमंत त्याचा पुरेपूर फायदा घेत असल्याने सचिन ने तर त्याला "वॉटरप्रूफ फोटोग्राफर हेमंत कोरेगांवकर " हि पदवीच बहाल केली.




वरती पठारावर पोहोचल्यानंतर आम्ही भोराई देवीच्या मंदिरात ओलेत्यानेच प्रवेश केला.  काळ्याकुट्ट अंधारात मोबाइलला चा उजेड लावून आम्ही देवीचे दर्शन घेतले. गडांवरील देवळात दिवा लावण्याची मला भारी आवड. हीच खरी दैवतं ज्यांनी शिवकाळात मावळ्यांच्या हाताला बळं दिलं आपलं स्वराज्य राखण्यासाठीं अशी माझी ठाम धारणा. प्रत्येकाला माथा टेकवण्याची श्रद्धास्थान हे लागतचं त्यातूनच त्याला नव्या कार्याची ऊर्जा आणि उर्मी मिळते. म्हणूनच काय त्यावेळी गड-किल्ल्यांवर देवस्थानांची निर्मिती झाली असावी.पण जवळ आणलेल दिवा बत्तीचे साहित्य एवढ्या पावसात भिजून वाया गेलेलं होत. त्यामुळे मोकळ्या हातानेच देवीचे दर्शन घेतल. हि छोटीशी हुरहूर मात्र मनाला लागून राहिली.
तिथून निघाल्यानंतर पठारावरूनच एका बाजू,ला उभ्या कातळ कड्यावरची तटबंदी स्पष्ट दिसत होती. त्या वेळी कशी काय बांधली असेल याचे कौतुक करत आणि निसर्गाचा पाहत आम्ही बराच वेळ तिथे घालवला. समोरचा मोठा दिसणारा धबधबा आणि ते मोहक दृश्य पाहून तर "DSLR हवा होता यार !" असे उद्गार हेमंत च्या तोंडातून बाहेर पडले. मी मात्र सगळं नजरेत जेवढे सामावून घेता येईल तेवढे घेण्याचा पर्यटन करत सर्व अनुभवत घेत होतो.





सुधागड ला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहेपावसाळ्यात तर येथील दृश्य केवळ नयनरम्य म्हणावे असे असतेगडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे.. गडावर टकमक टोक आहेया टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगडकोरीगड तैलबैला दिसतो. गडावर अनेक तलाव आहेतपंत सचिवांचा वाडातसेच भोरेश्वराचे मंदिर आहेपाच्छापूर दरवाजा, दिंडी दरवाजाधान्य कोठारेभांडय़ाचे टाकेहवालदार तळेहत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेतपावसाळ्यात हे सर्व पाहणे जरा अवघडच होऊन जातं.




गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. इथे मुलांसाठी साहस शिबिरं तर घेतली आहेतच, पण त्याचबरोबर अनेक संस्था दुर्गसंवर्धनाचे काम नेटाने करत असतात.


मंदिरा  बाहेरील वीरगळ 

भोराई देवी मंदिर 

थोड्याच वेळात आम्ही परतीच्या वाटेल निघालो. 
या सर्व निसर्गाचा आनंद घेत असताना या सगळ्यात आमचा अति उत्साही श्रीकांत मात्र दोनदा निसरड्या जागेवरून आपटला. "काय होऊन राहिलं बे " अशी आपली टिपिकल विदर्भ शैलीत झाडत उभा राहिला. मग तिथल्याच झऱ्यावर कपडे साफ करत त्याची मजा घेत आम्ही निघालो. सर्व ठिकाणी असणारा श्वान मित्र परतीच्या वाटेवरही आमच्या सोबतच होता. अगदी खाली शाळे जवळ येई पर्यंत. जाणून काही या सर्व प्रवासात तो आमचा एक सोबतीचा झाला होता. जवळ खाण्याचे काही सामान नसल्याने गावातील जवळच्या दुकानातून बिस्कीट पूडा घेऊन त्याला दिला आणि तो खात खात मस्त शेपूट हलवत आम्हाला जणू काही धन्यवादच देत होता. त्याला टाटा -बाय -बाय करत आणि सुधागडच्या निसर्गरम्य परिसराला आठवणींच्या रूपाने साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.






छायाचित्र सौजन्य: हेमंत कोरगांवकर