रणभूमी कावल्या - बावल्या खिंड


रणभूमी कावल्या - बावल्या  खिंड

(एका असामान्य लढ्याची साक्षीदार)




रणभूमी कावल्या - बावल्या  खिंड



दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या महादरवाजातून आणि टकमक टोकावरून उत्तरेच्या बाजूला नजर टाकली असता समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आकाशाला गवसणी घालणारे एक काळ्या भिन्न पाषाणाचे शिखर दिसते जे कोकणदिवा म्हणून प्रचलित आहे. पूर्वीच्या काळी दिशा दाखवण्यासाठी या शिखरावर दिवा लावला जात असे. म्हणूनच कदाचित त्याला कोकणदिवा असे नाव पडले असावे कदाचित!. याच कोकणदिवावरून राजधानी रायगडचा परिसर हा फार अप्रतिम दिसतो.
सह्य़ाद्रीच्या रांगांतुन रायगडाकडे उतरायला सर्वात जवळची वाट म्हणजे कावळे घाट. एका बाजूला कावळे गाव आणि दुसऱ्या बाजूला बावळे गाव यांच्या दोहोंमधली हि खिंड मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका रणसंग्रामाची साक्षीदार आहे.

कोकणदिव्यावरून दिसणारा रायगड आणि सभोवतालचा परिसर 




इतिहासाची पाने उलगडताना खिंड हा शब्द ऐकलं कि सर्वांच्या डोळ्यासमोर राहते ती  नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड ,प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा रणमर्दानी लढवलेली नेसरीची खिंड आणि शिवरायांनी कारतलब खानाचा पराभव केलेली उंबरखिंड.  पण अश्या अजून कितीतरी खिंडी अजूनही पडद्याआडच आहेत. ज्याप्रमाणे या खिंडीने मराठ्यांचा पराक्रम पहिला तसाच पराक्रम या कावल्या-बावल्या खिंडीने गोंदाजी जगताप आणि सर्कले नाईक यांचा पाहीला. २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सर्कले नाईक यांनी शहाबुद्दीनखानाच तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले. रायगड जिल्ह्यात सांदोशी गावाच्या डोईवर उभी असलेली गोदाजी जगताप व जिवा सर्कले नाईक यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही खिंड आजही तशी दुर्लक्षितच आहे
गेली कित्येक वर्ष दुर्गप्रेमींच्या सहवासाला मुकलेलेली हि खिंड आता नव्याने उजेडात आली आहे आणि दुर्गवीर सारख्या काही संस्था अश्याच अप्रचलित असलेल्या ऐतिहासिक जागा उजेडात आणण्याचे काम करत आहेत जेणे करून नव्या पिढीला हा न माहित असलेला इतिहास माहित व्हावा.
शौर्यदिनाच्या निमित्ताने या ऐतिहासिक खिंडीला भेट देण्याचा योग मला दुर्गवीरांच्या साथीने मिळाला. पुण्याहून रात्रीचाच प्रवास करत आम्ही चौघेजण निघालो. जाताना ताम्हिणी घाटाचा रस्ता पकडला. रस्त्याची दयनीय अवस्था पाहून उगाच या वाटेने आलो असं वाटायला लागलं होत. तीन तासाच्या प्रवासाला चक्क तास लागले आणि गम्मत म्हणजे जिथून रायगड जिल्ह्याची हद्द सुरु होते त्या नावाच्या पाटीखालून बरोबर चांगला रस्ता चालू होतो. प्रादेशिक वादामुळे रस्ते तसेच राहतात आणि प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होतात.
घाटरस्ता पार केल्यावर आम्ही रायगडला जाणारा रस्ता पकडला. रात्रीचा साधारण वाजला असेल. मुंबईहून आलेले दोघेजण आम्हाला जॉईन झाले होते आणि ते आमच्या पुढे व्हिलरवर चालत होते. अचानक ! ते दुसरी वाट सोडून उजव्या बाजूला गेले. "अरे!! ते वाट चुकले बघ.  फोन लाव त्यांना.. "
कॉल केल्यावर ते रिटर्न तआमच्या समोरच्याच रस्त्यावरून येताना दिसले. "अरेच्च्या!! हा काय प्रकार आहे. आम्ही तर तुम्हाला उजवीकडे जाताना पाहिलं मग तुम्ही समोरून कसे आलात. आम्हाला वाटलं रास्ता चुकलात म्हणून फोन केला. "चकवा तर नाही लागला ना.. " सचिन बोलले.
ट्रेकिंग ला जाताना बहुतांशी ट्रेकर्स ना असे अनुभव येतच असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे निघालो. रायगडच्या रस्त्यावरूनच डाव्या बाजूने एक रस्ता सांदोशी गावाकडे जातो. तोच पकडून आम्ही  थोड्याच वेळात गावातील मंदिरात पोहोचलो जिथे आमची राहण्याची व्यवस्था  केली होती. पहाटे उठल्यावर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर सगळ्या नव्या-जुन्या दुर्गवीरांची ओळख झाल्यावर आम्ही खिंडीचा रस्ता  पकडला.
कावळे घाटाचा रस्ता हा अतिशय दाट  वनराईअसलेल्या जंगलातून जातो. या खिंडीत जाण्यासाठी दुसराही एक मार्ग आहे तो म्हणजे पुण्याजवळील पानशेतपासुन सुमारे तीस कि.मी.वर घोळ नावाचे एक गाव आहे. या गावापासून घोळ-गारजाईवाडी-कावले खिंड अशी भटकंती आपल्याला करता येते. आमच्या बरोबर ३८ वर्ष ट्रेकिंग चा अनुभव असलेले साधारण ५८ वर्षाचे एक गृहस्थ देखील होते. त्यांच्याशी गप्पा मारत थोडी दमछाक करत आणि विश्रांती घेत साधारण दीड तासाच्या चढाईनंतर आम्ही त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलो जिथे रणसंग्राम घडला होता.


त्यावेळच्या अस्तित्वाच्या खुणा आजही आपल्याला पाहायला इथे मिळतात. इथे काही वीरगळी सापडल्या होत्या . त्या आता सध्या खाली नेऊन ठेवल्या आहेत. इथे खिंडीत एका दगडाला शेंदूर फासुन त्याची देव म्हणुन स्थापना केली आहे. या खिंडीत वरील बाजुने घसरून येणारी माती अडवण्यासाठी दोनही बाजुला दगडी भिंत घातलेली आहे ती आपल्याला आजही पाहायला मिळते. याच्याच माथ्यावर कोकणदिवा हा घाटाचा सरंक्षक उभा आहे. शिवकाळात या भागाचे फार मोठे महत्व होते. सह्याद्रीच्या या खो-यात असलेल्या डोंगररांगांतून रायगडावर सहजपणे पोहोचणे शक्य होऊ नये  म्हणून इथे चौक्या पहाऱ्या बसवलेल्या असायच्या. शिवकाळात घाटावरून येणारा मार्ग हा या दोन गावांच्या खिंडीतुन येई. त्यामुळे रायगडच्या रक्षणासाठी चौकी तयार करून जवळच्या सांदोशी गावातील जीवा सर्कले नाईक यांना चौकीचा नाईक (सोबत असणाऱ्या सैनिकांचे नाईक ) म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. काहींच्या मते सर्कले हे घराणे मूळचे दंड राजपुरी म्हणजे आत्ताचे मुरुड-रायगड येथील रामजी कोळ्याचे आरमार सांभाळत होते. रामजी कोळ्याने दिलेल्या सरखेल  या पदवीचा अपभ्रंश होऊन सर्कले  हे आडनाव रूढ झाले. या खिंडीच्या पराक्रमाची गाथा अशी कि,
तुळापूरी शंभूराजांच्या झालेल्या निधनानंतर औरंगजेबाने रायगडाचा फास आवळण्यास सुरुवात केली. त्याने सर्व सूत्रे झुल्फिरखानास दिली. शके १६११ शुक्ल संवत्सरे, चैत्र शुद्ध १५ औरंगजेबाच्या हुकुमानुसार झुल्फिरखानाने रायगडास वेढा दिला. ह्याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले होते. ही सुवर्ण संधी ठरवून औरंगजेबाने शहाबुद्धीन खानाला झुल्फिरखानाच्या मदतीस धाडले. माणकोजी पांढरे सारखे गद्दार हे आधीच मुघलांना जाऊन मिळाल्याने त्यांना खिंडीतून रायगडाला येण्याचा मार्ग माहित झाला.

शहाबुद्दीनखानाने २५ मार्च १६८९ या दिवशी हजारोंच्या सैन्याने या खिंडीतुन रायगड गाठण्याचा प्रयत्न केला़. याची माहिती जिवाजी नाईक सर्कले गोदाजी जगताप ह्या दोन सरदारांना झाली आणि स्वराज्याची राजधानी रायगडच्या रक्षणार्थ कावल्या- बावल्या  खिंडीत दोघेही फक्त आपल्या मावळ्यांसह  उभे ठाकले.  प्रत्येकाने आपापल्या हल्ल्याच्या जागा हेरून ठेवल्या होत्या.  शत्रू सैन्य टप्प्यात येताच मराठ्यांच्या गोफणी आग ओकू लागल्या. रणसंग्राम पेटला. पहिली फळी -दुसरी फळी  गारद झाली.  हाती असलेली समशेर घेऊन सारे वीर शत्रू वर तुटून पडले. भेटेल त्याल कापत मराठे वीर पुढे सरकू लागले. अंगावर तर रक्ताचा अभिषेकच होत होता. पण त्याची पर्वा होती कोणाला!. ध्येय फक्त एकच !  स्वराज्याचे रक्षण आणि राजाराम राजांना सुखरूप ठेवणे . काही मराठे खिंडीत कमी आले. कणभर मराठे मणभर मोघलांना पुरून उरले. मराठ्यांचा तो आवेश पाहून मोघली सैन्य माघार घेऊन पळाले. पराक्रमाची शर्थे झाली. मोघलांच्या वाढीव तुकड्या झुल्फिरखानाच्या फौजेला मिळण्यात असमर्थ झाल्या. खिंडीत जगताप आणि सर्कले घराण्यातील माणसांनी बाजीप्रभुसारखा पराक्रम केला. याच चार हातानी मोघलांचे ३०० सैन्य कापून काढले आणि त्यातच शेवटी हे दहाही वीर धारातीर्थी पडले. तत्कालीन प्रथेनुसार या दहा वीरांच्या विरगळ त्यांची आठवण म्हणुन उभ्या राहिल्या़. या विरगळ काही सतीशीळा आजही सांदोशी गावात आपल्याला पहायला मिळतात.
मोघलांचा हा डाव गोदाजी जगताप जिवाजी सर्कले नाईक आणि त्यांच्या नऊ योध्यांनी हाणून पाडला म्हणूनच राजाराम महाराजांना वाघ दरवाजाने सुखरूप निसटता आले आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणखी काही वर्ष चालू राहिले.
गोदाजी जगताप जिवाजी सर्कले नाईक यांनी पराक्रमाची शर्थ केली नसती तर आज महाराष्ट्राचा इतिहास काही वेगळा वाचायला मिळाला असता. अश्या या घनघोर युद्ध्याच्या इतिहासाची साक्षीदार आहे हि कावल्या - बावल्या खिंड.
एकदा तरी इतिहासाचा मागोवा घ्यायला आणि आपल्या शूरवीरांच्या रक्ताने पावन झालेल्या या ठिकाणी एकदातरी भेट द्यायला हवी.

इतिहास संदर्भ:-  किल्ले रायगड कथापंचविसी. तो रायगड, दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि आंतरजालावरून साभार.












water tank in kokan diwa