कास पठार आणि वजराई धबधबा


वजराई धबधब्याच्या दिशेने..




पावसाळा सुरू झाला, की सह्याद्री मध्ये रानफुलांचा उत्सव सुरु होतो. हा उत्सव पाहण्याकरिता डोंगरभटक्यांची पावले मग आपोआपच सह्याद्रीकडे वळू लागतात. श्रावण महिन्याच्या अखेरीस तर हा उत्सव अधिकच पाहण्यासारखा असतो. कासच्या रूपाने महाराष्ट्राला हि एक फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा, सीतेची आसवे अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! "मयुर २१ तारीख कुठे जाऊ नकोस. आपल्याला कास ला जायचंय". असा अमित चा मेसेज आला आणि मागचा-पुढचा विचार न करता "डन " असा रिप्लाय देऊन टाकला. मला तर कास भेटीपेक्षा वजराई धबधब्याचीच जास्त आस होती. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या या कास पठाराची हि निसर्ग नवलाई पाहण्याचा योग हा या वर्षी आलाच. या वर्षी पाऊस जरा जास्तच झाल्याने किती प्रकारची फुले पाहायला मिळतील हि जरा शंकाच होती. पण शेवटी हे तर सर्व निसर्गाच्याच हातात; त्यामुळे रंगीबेरंगी फुलांची उधळण पाहायला मिळणे हा तर एक नशिबाचाच भाग असं समजून शनिवारी पहाटेच मी,अमित, स्वयम आणि पूनम निघालो. सकाळ-सकाळ खूप भूक लागली होती त्यामुळे वाटेतच एका छानश्या हॉटेलमध्ये "थालीपीठावर" यथेच्छ ताव मारून आम्ही पुढे निघालो. सातारा शहरातून जाणाऱ्या कासच्या रस्त्यावर आम्ही पोहोचलो. आदल्या दिवशीच पाऊस पडून गेला होता आणि आज वातावरण थोडं ढगाळ होतं. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सोनकीच्या फुलांनी आधीच आपली सलामी दिली होती जशी काय तुमचं कास वर स्वागत करण्यासाठी ती आधीच उत्सुक असावीत. शेवटी आम्ही कास ला थोड्याच वेळात पोहोचलोच. गाडी पार्क करून कासच्या पठारावर आम्ही फुलांचा हा सोहळा अनुभवण्यासाठी निघालो. कास व्यवस्थापन समितीने येथून पठारावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती दहा रुपये शुल्क आकारून बसची व्यवस्था केली आहे.






 महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे. कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे.  पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. याच पठारावरील कास तलाव हा सातारा शहराला पाणीपुरवठा करतो.कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे.  हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने  जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत त्याचा समावेश केला. कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. याच गावालगत समुद्रसपाटीपासून १२१३ मीटर उंचीवरील कास पठाराचे एक हजार ९७२ हेक्टर राखीव वनक्षेत्र म्हणून वनखात्याने जाहीर केले आहे. हे पठार सातारा वन विभागातील मेढा व सातारा वनक्षेत्राच्या हद्दीत येते. कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचे मंदिर सुद्धा आहे.
वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कासवरील फुलांचे अस्तित्व धोक्यात येउ लागले होते. त्यामुळे वनविभागाने पठारावर दुतर्फा जाळी लावून त्यांना सरंक्षित केले आहे रानफुले पाहण्यासाठी येणाऱ्या शेकडो पर्यटकांच्या सोयीसाठी कास पठारावर आता पर्यटकांसाठी जांभ्या दगडात पायवाटा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याला एक वेगळचं रूप प्राप्त झालं आहे.  या वर्षी सात ते आठच प्रकारची फुले आली आहेत अशी तेथील वनविभागाच्या एका कार्यकर्त्याने माहिती दिली. निळ्या ,गुलाबी,जांभळ्या,पांढऱ्या ,पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगाची फुलांची उधळण पाहण्यात एक वेगळीच मजा येत होती. काही  विरळ तर काही ठिकाणी गर्द असे  गुलाबी फुलांचे गालिचे पहावयास मिळत होते. ढगाळ वातावरणातून मधूनच येणारी एखादी पावसाची सर आल्हाददायक वाटत होती. फोटोग्राफर्स साठी मनसोक्त फोटो काढायचे हक्काचं ठिकाण तर कासच.  त्यात आजकाल प्री -वेडिंग चे फॅड असल्याने निसर्गप्रेमींपेक्षा जास्त गर्दी त्यांचीच दिसत होती. कास पठारावर काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंतच म्हणावा लागेल.





कास पठारावरील फुलांचा आनंद घेतल्यानंतर दुसऱ्या गेट ने आम्ही बाहेर पडलो आणि कास तलावाकडे कूच केली. कास तलावाकडे जाताना गाडी पाठीमागेच ठेवून आम्ही मस्त चालत -चालत, थोडं फोटोसेशन करत आणि निसर्गाच्या  आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत कास तलावाजवळ पोहोचलो. थोडा वेळ कास तलावात पाण्यात पाय टाकून बसलो आणि माझी पवना तलावाच्या कॅम्पिंगची आठवण जागी झाली.

आता कुठे जायचं ? असा प्रश्न अमितने विचारल्यावर मी सांगितलं आता आपण  वजराई धबधबा पाहायला जाऊया.  वाटेत तिथल्याच एका ग्रामस्थाला विचारलं असता त्याने सांगितलं कि, तुम्ही जर सरळ गेलात तर धबधबा दिसेल पण एका बाजूनेच दिसेल. हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये कोसळतो हीच त्याची खासियत आहे आणि तो जर पाहायचा असेल तर इथून एक जंगलातून रस्ता जातो तिकडे पाहायला मिळेल. पण आता त्याचा रस्ता  नवख्या माणसाला कसा सापडणार बराच सल्लामसलत केल्यावर एक ठराविक मानधन ठरवल्यावर तो आम्हाला दाखवायला तयार झाला.
"अरे !! पण तो पाहून आपण परत येऊया का? तीन वाजले आहेत आता. " -- अमित
"येऊ. रे! परत काय वेळ येणार नाही अशी. चल तू . " असं बोलून मी अमित ला तयार केला. पण आमचा ड्राइवर मात्र कच्च्या रस्त्यावर गाडी घालायला तयार नव्हता. आपल्याला फक्त थोड्या अंतरापर्यंतच गाडी घेऊन जायचंय आणि मग आम्ही तिथून पायी जाऊ असं सांगितल्यावर थोडं  नाखुशीनेच तो तयार झाला.
गाडी बाजूला लावून निसर्गाच्या एका अनामिक ओढीने आम्ही धबधब्याकडे कूच केली. अमित थोडा साशंकच होता कि यावर विश्वास कसा ठेवायचा. पण मी मात्र बिनधास्त होतो. नाव-गाव विचारत, चालत-चालत त्यांच्याबरोबर मी बोलायला सुरुवात केली.
"तुमचं नाव काय हो?"
"माझं नाव धोंडिबा काळे. म्या हिथलाच हाय पलीकडच्या गावातला. दर शनिवार-रविवार लोक येत्यात इकडं . कोणतरी येतंय आणि मग धबधबा दावायच्या निमित्ताने आम्हाला जरा मिळतंय काय बाय उत्पन्न."
पुन्हा एकदा आडवाटेवरच्या गावातील लोकांचा रोजच्या जगण्यातील संघर्ष समोर येत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही जंगलातून चालत होतो. पूनम चालेल कि नाही असं वाटत असताना ती मात्र एकदम बिनधास्त अवघड वाटेवरून पण चालत होती.
"अरे!! मयुर  मैने और स्वयम ने ट्रेकिंग किया है पहले.. तुम टेंशन मत लो .. चलो आगे".


भांबवलीच्या जंगलात बरेच वन्यजीव आहेत, मुख्यत्वे करून रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर, इ. आणि क्वचित वाघ, अस्वलेदेखील दिसतात असे बोलतात. अनेक प्रकारचे पक्षी, मुख्यत्वे करून मोर-लांडोर यांचे दर्शन होते. फुलपाखरांच्या असंख्य जाती दृष्टीस पडतात. या जंगलात विविध प्रकारची औषधी झाडे असून प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मरुडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल (डायबिटीससाठी) आणि इतर वनौषधी झाडेझुडपे आढळतात.
जंगलातून चालत असताना पावसाच्या हलक्या सरी चालूच होत्या. त्या दाट जंगलातून वाट काढत एका निमुळत्या उतारावर आम्ही जाऊन पोहोचलो आणि समोर जे काही दृश्य पहिले ते खरंच अवर्णनीय होतं.केलेल्या पायपिटीचं सार्थक झालं होतं. एवढा मोठा तीन टप्प्यांमध्ये  कोसळणारा धबधबा मी प्रथमच पाहत होतो. असं वाटतं  होतं  कि, पांढऱ्याशुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याने हिरवी शाल पांघरली आहे आणि वरती त्याने ढगांचा मुकुट चढवला आहे. आम्ही जिथे उभे होतो तिथून खाली फक्त खोल दरी होती. जरा जरी पुढे गेलो आणि तोल गेला कि डायरेक्ट स्वर्गच. वजराई धबधब्याची उंची हि तब्बल ५६० मी. (१८४० फूट) इतकी आहे. तो तीन टप्प्यांत कोसळतो आणि हा मेघालयातील नोहाकालीकाई नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात उंचीवरून कोसळणारा धबधबा मानला जातो.
धबधबा पाहून तिथून आम्ही परतीला निघालो. परतताना माझ्या पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला, ओझरती नजर टाकली तर काही दिसलं नाही म्हणून दुर्लक्ष केलं तर परत पायाला चुरचुरल्याचा जाणवलं. नीट  पाहिलं तर दिसलं  कि पायाला काळपट काहीतरी चिकटलंय म्हणून मी हात लावला तर ते हालचाल करायला लागलं. "अरे!! हा तर जळू.." असं मी जोरात बोललो.
"थांबा..  थांबा..  मी काढतो. काही घाबरू नका त्याचं  काही नसतं  एवढं." असं  बोलून धोंडिबानी त्याला आपल्या हाताने काढलं  आणि टाकळ्याचा  पाला लावला. पण त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. पुढे चालत आलो तर पुन्हा त्याच ठिकाणी ४-५ चिकटले होते. आता मात्र ते माझी पाठ सोडायला तयारच नव्हते. कोयनेच्या जंगलात जळू त्रास देतात असं ऐकलं  होतं . पण आज ते प्रत्यक्षात मी अनुभवत होतो. नंतर पाहतो तर अमित चप्पल ठोकायला लागला होता.   त्यांचा पाय पूर्ण रक्ताने लाल झाला होता. थोडं SAVLON लावून आम्ही जास्त वेळ न काढता गाडीत बसलो. पायातल्या सॅंडल आम्ही घरात परत जाई पर्यंत घालायच्याच नाही असं ठरवलं न जाणो त्यात एखादा चिकटून बसला असेल आणि परत त्रास देईल. अमित चं रक्त थांबतच नव्हतं . मग त्याला  मी कॉटन लावून धरून ठेवायला सांगितलं आणि थोड्यावेळाने ते आपोआप थांबेल. घाबरू नको. असा सल्ला दिला. तो पण मनातल्या मनात म्हणत असेल, "आयला उगाच लागलो मयूरच्या नादी. कुठे पण नेतो हा .. ".
नंतर घरी पोहोचल्यावर लक्षात आला कि पूनम चा पाय देखील रक्ताने लाल झाला होता. जळूने स्वयम सोडुं सगळ्यांना शिकार बनवलं होतं . मग माझ्या डॉक्टर मित्राचा अभिजित वायचळ चा फोनवरून सल्ला घेतला आणि precaution म्हणून तिघांनी एक TT  चे इंजेकशन घेतलं. परंतु भांबवलीच्या धबधब्याचे जे सुख अनुभवलं होतं त्याच्यापुढे झालेला त्रास हा अगदीच नगण्य होता.
भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. कास पुष्पपठारापासून अवघ्या पाच किमी अंतरावर निसर्गाचा हा चमत्कार आहे. या धबधब्यापर्यंत गाडीने जाता येत नाही. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे.नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, वीणेच्या झंकारासारखा वाऱ्याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असं हे सुंदर, मनमोहक ठिकाण.भांबवली वजराई धबधबा बघितला कि स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे छोटे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

भांबवली वजराई धबधबा पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी. भांबवली वजराई धबधबा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो हे मात्र नक्की. 








मी काही वनस्पती अभ्यासक नाही परंतु छंद म्हणून कासपठारावर आढळलेल्या काही फुलांची जुजबी माहिती खाली देत आहे.

11. Common name:- Marsh DewFlower
मराठी नाव:- अबोलीमा
Botonical Name:- Murdannia lanuginose
प्रजाती:- डे फ्लॉवर फॅमिली
हंगाम:- ऑक्टोबर ते नोव्हेंबर
आढळण्याची ठिकाणं :-  भारत द्विलकल्प (Peninsular India)




22. Common name:- Hairy Smithia or Micky mouse
मराठी नाव:- कावला
Botonical Name:- Smithia hirsuta
प्रजाती:-  Pea family
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर





 3.Common name:- Large Dewflower
मराठी नाव:- नीलिमा
Botonical Name:- Murdannia simplex
प्रजाती:-  डे फ्लॉवर फॅमिली
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर






 4. Common name:- Rock Dipcadi
मराठी नाव:- दिपकाडी
Botonical Name:- Dipcadi saxorum
प्रजाती:-  Asparagus family
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर
आढळण्याची ठिकाणं :-  बोरिवली मधील कान्हेरी च्या परिसरात मुख्यत्वे आढळतात






 5. Common name:- Grass leaved
मराठी नाव:- खुरपापणी किंवा सीतेची आसवे
Botonical Name:- Utricularia graminifolia
प्रजाती:-  Bladderwort family
हंगाम:- सप्टेंबर ते नोव्हेंबर

आढळण्याची ठिकाणं :-  सह्याद्री- पश्चिम घाट